भारतातील सर्वात लांब महामार्ग, गुगल मॅपच्या मदतीशिवाय करू शकता काश्मीर ते कन्याकुमारी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 06:25 PM2024-07-10T18:25:01+5:302024-07-10T18:29:38+5:30

NH 44, India's Longest Highway: गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये रस्ते आणि महामार्गांचे मोठे जाळे विणले गेले आहे. यातील काही रस्ते लहान तर काही रस्ते प्रचंड मोठे आहेत. मात्र तुम्हाला भारतातील त्या रस्त्याबाबत माहिती आहे का, ज्या रस्त्यावरून तुम्ही एकदा प्रवासाला सुरुवात केली की, गुगल मॅपच्या मदतीशिवाय तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पोहोचू शकता.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये रस्ते आणि महामार्गांचे मोठे जाळे विणले गेले आहे. यातील काही रस्ते लहान तर काही रस्ते प्रचंड मोठे आहेत. मात्र तुम्हाला भारतातील त्या रस्त्याबाबत माहिती आहे का, ज्या रस्त्यावरून तुम्ही एकदा प्रवासाला सुरुवात केली की, गुगल मॅपच्या मदतीशिवाय तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पोहोचू शकता.

देशातील या सर्वात लांब महामार्गाचं नाव आहे एनएच-४४. हा देशातील सर्वात मोठा महामार्ग आहे. याची लांबी ३ हजार ७४५ किलोमीटर एवढी आहे. हा महामार्ग देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारीला देशाच्या उत्तरेकडे असलेल्या श्रीनगरशी जोडतो. हा महामार्ग देशातील ११ राज्यं आणि सुमारे ३० मोठ्या शहरांजवळून जातो.

एनएच ४४ हा काही नवा महामार्ग नाही आहे. तर तो आधीपासून अस्तित्वात असलेल्या सात महामार्गांचं एकत्रिकरण करून तयार करण्यात आला आहे. एकत्रिकरणामुळे केवळ दळणवळण सुलभ झालेलं नाही तर उत्तर आणि दक्षिणेमधील संपर्कही मजबूत झाला आहे. या महामार्गावरून दररोज लाखो वाहनं ये जा करत असतात.

या महामार्गाच्या वाटेत तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीर ही राज्यं येतात. या महामार्गाचा सर्वाधिक भाग हा तामिळनाडूमधून जातो. तिथे या महामार्गाची लांबी ही ६२७ किमी आहे.

तेलंगाणा आणि मध्य प्रदेशमध्ये या मार्गाची लांबी ही प्रत्येकी ५०४ किमी आहे. जम्मू काश्मीरमध्ये ३०४ किमी आणि आंध्र प्रदेशमध्ये २७८ किमी एवढी लांबी आहे. पंजाबमध्ये २७८ किमी, महाराष्ट्रात २३२ किमी, उत्तर प्रदेशात १८९ किमी हरियाणामध्ये १८४ किमी तर कर्नाटकमध्ये या महामार्गाची लांबी १५० किमी आहे.

नॅशनल हायवे ४४ भारताच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पसरलेला आहे. काही ठिकाणी हा महामार्ग एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेच्या अगदी जवळून जातो. पाकिस्तानच्या सीमेजवळ असल्याने काश्मीरपासून पठाणकोटपर्यंत या महामार्गाजवळ कडेकोट सुरक्षाव्यवस्था असते.

देशातील या सर्वात लांब महामार्गावरून प्रवास करताना तुम्हाला अनेक रोमांचक दृश्य पाहायला मिळतात. काही ठिकाणी बर्फाच्छादित पर्वत, काही ठिकाणी मैदानी प्रदेश तर काही ठिकाणी सागरी भागही दिसतात. मध्य प्रदेशमधील कान्हा नॅशनल पार्क येथे वन्य प्राण्यांना रस्ता पार करता यावा यासाठी ७५० मीटर लांब अंडरपास तयार करण्यात आला आहे.