संसदेत ज्या रजिस्टरवर नवनियुक्त खासदारांनी स्वाक्षरी केली त्यावर काय लिहिलंय?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 02:15 PM2024-06-24T14:15:19+5:302024-06-24T14:59:47+5:30

संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ सभागृहात पाहायला मिळाला. भर्तृहरी महताब यांना हंगामी अध्यक्ष बनवल्यामुळे नाराज विरोधकांनी हे परंपरेविरोधात आहे असा आरोप सत्ताधाऱ्यांवर केला. विरोधकांच्या गोंधळात सर्व नवनियुक्त खासदारांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ ग्रहण केली.

या शपथ ग्रहण कार्यक्रमात सर्वांचे लक्ष एका गोष्टीने वेधले ते म्हणजे रजिस्टर, या रजिस्टरवर सर्व खासदारांनी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर स्वाक्षरी केली. अखेर या रजिस्टरमध्ये सर्व खासदार स्वाक्षरी करतात त्यात काय लिहिलेले असते हे जाणून घेऊया.

लोकसभा सदस्य म्हणून ज्या रजिस्टरमध्ये स्वाक्षरी करण्यात येते, त्यात ३ गोष्टींचा उल्लेख असतो. सभागृहाचा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर रजिस्टरमध्ये काही खासदार लिहिताना दिसतात, ते नेमकं काय लिहितात याची उत्सुकता तुम्हालाही लागली असेल.

या रजिस्टरमध्ये सर्वात आधी लोकसभा सदस्याचं नाव लिहिलेले असते, त्यानंतर निवडून आलेल्या राज्यातील लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख रजिस्टरच्या एका कॉलममध्ये असतो.

त्यानंतर दोन्ही कॉलम भरल्यानंतर खासदारांना त्यावर स्वाक्षरी करावा लागते. आज लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेताना सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राधामोहन सिंह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह इतरांनी शपथ घेतली.

१८ व्या लोकसभा सभागृहाचं हे पहिलं अधिवेशन आहे. निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर पहिल्यांदाच खासदार लोकसभेत पोहचले होते. जेव्हा संसदेचे अधिवेशन असते तेव्हा सभागृहात सदस्यांना एक ठराविक जागा बसण्यासाठी दिली जाते.

संसदेत कुठल्याही सदस्याला बसण्यासाठी जागा ही त्याच्या पक्षाला मिळालेल्या संख्येच्या आधारे ठरते. ज्या पक्षाचे जितके जास्त खासदार त्यांना तितक्या जागा दिल्या जातात. सभागृहात अनेक ब्लॉक्स असतात, पक्षाच्या सदस्य संख्येनुसार त्यांचे ब्लॉक्स निश्चित केले जातात.

जर कुठल्या पक्षाचे ५ सदस्य असतील तर त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था असते. ज्या पक्षाचे ५ पेक्षा कमी सदस्य आहेत त्यांच्या बसण्याची जागा वेगळी असते. त्यात अपक्ष निवडून आलेल्या खासदारांनाही बसण्याची व्यवस्था ठरलेली असते.

सभागृहात सर्वात आधी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या खासदारांना जागावाटप होते. पुढील रांगेत लोकसभा अध्यक्षांच्या उजव्या हाताला सत्ताधारी पक्ष आणि डाव्या हाताला विरोधी पक्षांच्या खासदारांना बसण्याची व्यवस्था असते.

अध्यक्षांच्या डाव्या बाजूला पहिल्या रांगेत विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या बाजूला लोकसभा उपाध्यक्षांना बसण्याची व्यवस्था असते. सत्ताधारी पक्षात भाजपा आणि विरोधी पक्षात काँग्रेसचे खासदार पुढे बसतील. ज्या पक्षाचे जास्त खासदार त्यांनाच पुढे बसण्याची सुविधा असते.