सोशल मीडियामुळे सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात, काय आहेत कारणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 10:40 IST2025-03-18T10:31:37+5:302025-03-18T10:40:27+5:30

Divorce Rate Rise in Maharashtra: महत्वाचे म्हणजे, घटस्फोट घेणाऱ्यांचे देशात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या अहवालातून पुढे आले आहे...

सोशल मीडियाच्या प्रभावामुळे नातेसंबंधांवर खूप विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्याच्या घटना तीन पटींनी वाढल्याचे चिंताजनक वास्तव एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

महत्वाचे म्हणजे, घटस्फोट घेणाऱ्यांचे देशात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या अहवालातून पुढे आले आहे.

‘एडजुआ लीगल्स गुगल ॲनालिटिक २०२५’च्या अहवालानुसार दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनौ, हैदराबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये अलीकडील वर्षांत घटस्फोटाच्या अर्जांची संख्या तीन पटीने वाढली आहे. ‘कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेवियर’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

काय आहेत कारणे? मेट्रो शहरांतील अत्यंत व्यस्त आणि वेगवान जीवनशैलीमुळे लोकांच्या आयुष्यात विविध प्रकारचे तणाव निर्माण होत आहेत. नोकरदार पती किंवा पत्नीला वेळ कमी मिळत असल्याने नात्यांना वेळ देणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

कामाचे लांबलचक तास, कामावर जाण्यासाठी खर्च होणारा वेळ, नोकरीतील तणाव आणि दबाव, वाढती महागाई, आर्थिक जुळवाजुळवीची कसरत आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे ओझे यामुळे नात्यांमध्ये ओलावा नसल्याचे दिसून येते.

अहवालात घटस्फोटांच्या प्रमाणाची तुलना प्रत्येक व्यक्तीच्या फेसबुक अकाउंटसोबत करण्यात आली. सोशल मीडियाच्या उपयोगामुळे वैवाहिक संबंध संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे या अहवालातून ठळकपणे पुढे आले आहे.