Ayushman Card : एका कुटुंबातील किती लोक काढू शकतात आयुष्मान कार्ड?; सरकारने आता बदलला 'हा' नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 08:02 AM2024-09-12T08:02:01+5:302024-09-12T08:19:15+5:30

Ayushman Bharat Yojana And Ayushman Card : सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर आयुष्मान कार्ड तयार केलं जातं आणि त्यानंतर त्याद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतात.

आयुष्मान भारत योजना ही लोकांना मोफत उपचार देण्यारी एक योजना आहे. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर आयुष्मान कार्ड तयार केलं जातं आणि त्यानंतर त्याद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतात.

सरकार तुम्हाला दरवर्षी हे संरक्षण देतं आणि हा खर्च उचलतं. बुधवारी या सरकारी योजनेत मोठा बदल करण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत ७० वर्षांवरील सर्व वृद्धांना ‘आयुष्मान योजने’मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जर आपण सरकारी आकडेवारीवर नजर टाकली तर आयुष्मान भारत योजनेंतर्गत बनवल्या जाणाऱ्या आयुष्मान कार्डांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि ३० जून २०२४ पर्यंत त्यांची संख्या ३४.७ कोटींहून अधिक झाली होती.

या कालावधीत १ लाख कोटी रुपयांपर्यंतच्या ७.३७ कोटी आजारी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थी देशभरातील २९००० हून अधिक सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य सेवांचा लाभ घेऊ शकतात.

जेव्हा एखादी योजना सरकारद्वारे सुरू केली जाते, तेव्हा पात्रतेशी संबंधित तपशील देखील जारी केले जातात. एकाच कुटुंबातील किती लोक आयुष्मान कार्ड बनवू शकतात? याविषयी जाणून घेऊया...

या सरकारी योजनेत गरजूंना सुविधा देण्यासाठी अशी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. याचाच अर्थ, एका कुटुंबातील जितक्या लोकांना आयुष्मान कार्ड हवं आहे, तेवढे लोक ते बनवू शकतात. परंतु कुटुंबातील हे सर्व सदस्य या योजनेसाठी पात्र असले पाहिजेत.

आयुष्मान भारत योजनेच्या पात्रतेनुसार, ग्रामीण भागात राहणारे, आदिवासी, अनुसूचित जाती किंवा जमातीचे निराधार, अपंग, असंघटित क्षेत्रात काम करणारे किंवा मजूर म्हणून उदरनिर्वाह करणारे सर्व लोक या योजनेसाठी पात्र आहेत. तुम्ही पात्रतेची माहिती ऑनलाइन मिळवू शकता.

- अधिकृत वेबसाइट pmjay.gov.in वर जा. होमपेजवर 'Am I Eligible' या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमचा १० अंकी मोबाईल नंबर सबमिट करावा लागेल. यानंतर नंबरवर मिळालेला ओटीपी टाका.

आता स्क्रीनवर तुमचे राज्य निवडा, त्यानंतर मोबाईल नंबर आणि रेशन कार्ड नंबर टाका. यानंतर, तुम्ही पात्र आहात की नाही याची संपूर्ण माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

जर तुम्हाला या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही टोल फ्री क्रमांक १४५५५ वर कॉल करून माहिती मिळवू शकता. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही जवळच्या CSC केंद्रावर जाऊन कागदपत्रांसह अर्ज करू शकता.

अर्ज करताना जी कागदपत्रं विचारली जातात, त्यामध्ये आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशनकार्ड याशिवाय एक्टिव्ह मोबाइल नंबर आवश्यक आहे.