गुरं चरायला नेणाऱ्या जीतू रायचा सुवर्णपदकापर्यंतचा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 16:43 IST2018-04-09T15:07:15+5:302018-04-09T16:43:47+5:30

नेमबाज जीतू रायनं १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात नव्या विक्रमासह सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

जीतूनं २३५.१ गुणांची कमाई करत सोनेरी लक्ष्य साध्य केलं. ऑस्ट्रेलियाच्या केरी बेलचं आव्हान मोडून काढत जीतूनं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. मात्र आज भारतीय नेमबाजीतलं महत्त्वपूर्ण नाव झालेल्या जीतूचं बालपण गुरंढोरं राखण्यात गेलं.

जीतूला जग आज पिस्तुल किंग नावानं ओळखतं. मात्र ज्या हातात आज पिस्तुल आहे, त्या हातात कधीकाळी मक्याची कणसं होती. नेपाळमध्ये जन्मलेला जीतू लहानपणी मका आणि बटाट्याच्या शेतीत कुटुंबाला मदत करायचा.

गोरखा रेजिमेंटची भरती ब्रिटिश सैन्याकडून केली जाते. त्यामुळे नेपाळमध्ये वास्तव्यात असलेल्या जीतूला गोरख रेजिमेंटमध्ये भरती व्हायचं होतं.२००६ मध्ये जीतू ब्रिटिश सैन्यात भरती होण्यासाठी स्वत:च्या नावाची नोंदणी करायला गेले. मात्र या नोंदणीला उशीर असल्यानं त्यानं भारतीय लष्करात भरती होण्याचा निर्णय घेतला.

जीतूची नेमबाजी चांगली होती. मात्र तरी त्याला नेमबाजीत रस नव्हता. त्यामुळे जीतू सुरुवातीला नेमबाजीत अपयशी ठरला. मात्र तिथून जीतूनं प्रचंड मेहनत घेतली आणि भारताला एक गुणी खेळाडू मिळाला.

भारतीय लष्करात असताना २०१३ मध्ये जीतूनं आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. यानंतर जीतूनं २०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ५० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. यानंतर जीतूनं अनेक प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये भारतीयांची मान अभिमानानं उंचावली.