आमीरशी ५ वर्षे अबोला, सलमानला लग्नाला नकार आणि शाहरुखची दोस्ती- हसऱ्या जुही चावलाची अनकही कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 05:06 PM2023-11-13T17:06:01+5:302023-11-13T17:24:14+5:30

6 Interesting Facts About Juhi Chawla Birthday Special : जुही चावला ही अत्यंत उत्तम अभिनेत्री, वैयक्तिक आयुष्यातील आघातांनी तिला छळले पण ती हरली नाही.

भारतीय सुंदरी अर्थात मिस इंडिया जुही चावला आपल्या सौंदर्य आणि अभिनयासाठी ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग फार मोठा आहे. तिने आपल्या अभिनयातून ऐंशी आणि नव्वदचा दशक गाजवला होता. कयामत से कयामत तक, डर, दिवाना मस्ताना, इश्क़ यासह अनेक चित्रपटांमध्ये सोज्वळ भूमिका साकारून, तिने त्या पात्रांना न्याय दिला. मात्र, तिचा खडतर प्रवास हा सोपा नव्हता. यासह तिची पर्सनल लाईफ देखील तितकीच चर्चेची ठरली(6 Interesting Facts About Juhi Chawla Birthday Special).

एकेकाळी तिने बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या लग्नाच्या मागणीला धुडकावून लावले होते. शिवाय अनेक वर्ष आपले लग्न मिडियापासून लपवून ठेवले होते. आज तिचा ५६ वा वाढदिवस. करिअर ते पर्सनल लाईफ, तिचा प्रवास कसा होता? पाहूयात.

१३ नोव्हेंबर १९६७ रोजी जुहीचा हरयाणास्थित अंबाला येथे जन्म झाला. मुंबईत शिक्षणासाठी आलेल्या जुहीने या काळात मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावण्याचं ठरवलं. १९८४ साली जुहीने मिस इंडियाचा किताब पटकावला, व सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरली.

त्यानंतर जुहीने 'सल्तनत' या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे तिने कन्नड सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. मात्र, त्यानंतर सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर तिने बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपटांची मालिका सुरु केली. हिंदीखेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये अभिनय केलंय.

हिट चित्रपट देत असताना तिच्या पर्सनल आयुष्यात अनेक उलथापालथ झाली. ज्यामुळे तिने बॉलीवूडमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. १९९८ मध्ये जूहीच्या आईचं एका अपघातात निधन झालं. त्यानंतर जूहीच्या वडिलांचं देखील निधन झालं. २०१२ साली जूहीच्या छोट्या बहिणीचा कर्करोगाने मृत्यू झाला. तर २०१० साली जूहीच्या छोट्या भावाला स्ट्रोक आला आणि २०१४ साली त्याचं निधन झालं.

आपल्या कुटुंबियांना गमावल्यानंतर जूही पूर्णपणे एकटी पडली होती. या काळात उद्योगपती जय मेहता यांनी तिला आधार दिला. त्यांनी १९९६ साली एकमेकांशी लग्नगाठ बांधली. त्यांच्यात ६ वर्षांचा अंतर असून, त्यांचं हे दुसरं लग्न असल्याचे बोलले जाते. जेव्हा जुही आणि जय यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले, तेव्हा जुहीने आपले लग्न लपवून ठेवलं असल्याचं मान्य केलं होतं.

फिल्मी कार्यकिर्दीत तिने अनेक दिग्गच अभिनेत्यांसोबत काम केलं. आमीर खानसोबतचा 'कयामत से कयामत' तक हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. पण आमीरच्या प्रँक-मिश्कील स्वभावामुळे त्यांच्यात अंतर पडलं. तिने ५ वर्षांसाठी आमीरसोबत अबोला धरला होता. या काळात तिने राजा हिंदुस्तानी या चित्रपटाची ऑफर रिजेक्ट केली होती.

शाहरुख खान आणि जुहीची दोस्ती संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. जुहीच्या उतार काळात शाहरुखने खूप मदत केली असल्याचं जुही सांगते. फक्त चित्रपटातच नाही तर, खऱ्या आयुष्यातही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघेही आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सचे को-पार्टनर्स आहेत. शिवाय शाहरुखचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणात जुहीने आर्यनच्या जामीनपत्रावर सही केली होती.

सलमान खानसोबत तिने रील लाईफमध्ये लीड भूमिकेत काम जरी केलं नसलं तरी, रिअल लाईफमध्ये सलमानला ती लाईफ-पार्टनर म्हणून हवी होती. एका मुलाखतीत सलमानने, जुहीच्या वडिलांनी लग्नासाठी नकार दिला असल्याचे सांगितले. मात्र, जुहीने देखील जेव्हा सलमान 'द सलमान खान' नव्हता, तेव्हा तिने त्याच्यासोबत चित्रपटात मेन लीडमध्ये काम करण्यास नकार दिला होता. 'दिवाना मस्ताना' या चित्रपटातील कॅमिओ सोडल्यास त्यांनी एकत्र स्क्रीन कधी शेअर केली नाही.