कोणते आजार कमी करण्यासाठी कोणता सुकामेवा खाणं ठरतं फायदेशीर, बघा आयुर्वेद काय सांगतो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2023 02:00 PM2023-10-06T14:00:07+5:302023-10-06T14:04:17+5:30

आयुर्वेदानुसार अगदी पुरातन काळापासून सुकामेवा हा उर्जेचा उत्तम स्त्राेत मानला जातो. कफ, वात आणि पित्त हे ३ दोष कमी करण्यासाठी सुकामेवा खाणं अतिशय फायदेशीर ठरतं.

सुकामेवा नुसता खाण्यापेक्षा तो रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाणं आरोग्यासाठी अधिक चांगलं ठरतं. शिवाय सुकामेवा नेहमी दिवसा खावा. रात्री सुकामेवा खाणं टाळावं. कारण तो पचायला जड असतो. आता कोणता सुकामेवा खाल्ल्याने आरोग्याला कोणते लाभ होतात ते पाहूया....

बदाम खाल्ल्याने वात आणि पित्त दोष कमी होतो. शिवाय बुद्धी, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी बदामाचा उपयोग होतो.

वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी खजूर खावेत. पचनक्रिया चांगली होण्यासाठीही खजूर खाणे फायद्याचे ठरते.

पित्त आणि वात दोष कमी करण्यासाठी मनुका उपयुक्त आहेत. त्वचा अधिक चांगली होण्यासाठीही मनुका खाव्या.

वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी काजू खावे. काजू उष्ण मानले जातात.

योग्य प्रमाणात अक्रोड खाल्ले तर वात, कफ आणि पित्त असे तिन्ही दोष कमी करण्यासाठी ते फायदेशीर आहेत. त्यातून हेल्दी फॅट खूप चांगल्या प्रमाणात मिळतात. तसेच मेंदूच्या आरोग्यासाठी अक्रोड चांगले मानले जातात.

पिस्ता हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असून वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी त्यांचा फायदा होतो.