करा हेल्दी वेटलॉस, आजारपण आसपासही फिरकणार नाही! आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात फक्त ५ उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2022 08:10 AM2022-08-27T08:10:10+5:302022-08-27T08:15:01+5:30

वाढतं वजन, त्यात पुन्हा कमी होणारी रोगप्रतिकारक शक्ती आणि उद्भवणारे वेगवेगळे आजार, यामुळे वैतागला असाल तर आयुर्वेदिक तज्ज्ञ (Ayurved expert) सांगत आहेत ते ५ उपाय करून बघा.. वेटलॉस होण्यास मदत तर होईलच पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल.(how to boost immunity?)

आजारपण टाळण्यासाठी कोणत्या आयुर्वेदानुसार कोणत्या ५ गोष्टी करणं कटाक्षाने टाळलं पाहिजे आणि का बरं, याविषयीची सविस्तर माहिती आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अलका विजयन यांनी dralkaayurveda या त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

यामध्ये त्यांनी ५ अगदी साध्या- सोप्या गोष्टी सांगितल्या असून त्या आपल्या रुटीनमध्ये आणणं ही काही अवघड गोष्ट नाही. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच आजारपण टाळण्यासाठी हे काही उपाय करून बघायला हरकत नाही.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सुर्योदयापुर्वी उठणे. लवकर उठण्याच्या सवयीमुळे शरीरात कफदोष निर्माण होत नाही. त्यामुळे सर्दी- खोकला, चेहऱ्यावर पिंपल्स येणे असा त्रास जाणवत नाही.

दिवसाच्या सुरुवातीलाच रिकाम्यापोटी बदाम, अक्रोड, शेंगदाणे असे नट्स प्रकारातला सुकामेवा खाऊ नका. यामुळे शरीरात आम्लनिर्मिती होते. त्यामुळे पचनाचा त्रास, सांधेदुखी, थकवा, डोकेदुखी असा त्रास होऊ शकतो.

दही हे उत्तम प्रोबायोटिक मानलं जातं. पण त्यापेक्षाही ताक पिणं अधिक चांगलं. त्यामुळे जळजळ, अपचन असा त्रास होत नाही. त्यामुळे वाटीभर दही खाण्यापेक्षा ग्लासभर ताक प्या.

नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या ३ गोष्टींव्यतिरिक्त अन्यवेळी सतत काहीतरी खात राहणे टाळा.

वेटलॉससाठी अनेक जण कोमट पाण्यात मध टाकून पितात. वेटलॉस करण्यासाठी मध आणि कोमट पाणी हे दोन्ही उपयुक्त असले तरी ते वेगवेगळे सेवन करा. गरम पाण्यात मध टाकल्याने त्याच्या नैसर्गिक रुपात बदल होतात आणि त्यात endotoxin तयार होऊ लागतात.