नववीत मिळाली चित्रपटाची ऑफर-१९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; दिव्या भारतीला कमी वयात मिळालं यश पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2024 04:47 PM2024-02-25T16:47:56+5:302024-02-25T18:02:23+5:30

Divya Bharti's 50th birth anniversary; 10 lesser known facts about Divya Bharti : दिव्याला हिंदीही वाचता यायचं नाही; साजिद नाडियाडवालाशी लग्न करण्यास वडिलांनी दिला होता नकार कारण..

दिव्या भारती. ९० चा काळ गाजवणारी भारतीय सिनेसृष्टीतील सुंदर आणि हरहुन्नरी अभिनेत्री. तिचं बहारदार सौंदर्य पाहून तिला कमी वयात सिनेसृष्टीत काम मिळत गेलं, आणि तिने संधीचं सोनंही केलं. भारतीने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात किशोरवयात केलं. ती पहिल्यांदा तेलुगू चित्रपट 'बॉबिली राजा'मध्ये झळकली. तेव्हा ती पिन-अप मॉडेलिंगसाठी फोटोशूट करायची. पण तिला खरी ओळख हिंदी सिनेसृष्टीतून मिळाली (Divya Bharti). अवघ्या ३ वर्षाच्या कारकिर्दीत तिने २१ चित्रपटात काम केलं. शिवाय नव्वदच्या दशकात ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली (Successfull Actress). आज ती आपल्यात नाही, पण तरीही तिचे चित्रपट आणि गाजलेले गाणे चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात(Divya Bharti's 50th birth anniversary; 10 lesser known facts about Divya Bharti).

भारती आपल्यात असती, तर तिने आज पन्नाशी गाठली असती. २५ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबईत तिचा जन्म झाला होता. ५ एप्रिल १९९३ रोजी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. अल्पावधतीच हिंदी चित्रपटसृष्टीची आघाडीची अभिनेत्री ठरलेल्या दिव्याचा मृत्यू सगळ्यांनाच धक्का देऊन गेला होता.

दिव्या तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. आईचे नाव माती भारती तर, वडिलांचे नाव ओम प्रकाश भारती असे होते. तिला कुणाल नावाचा एक धाकटा भाऊ आणि सावत्र बहीण पूनम होती. पूनम ही ओम प्रकाश भारतीच्या पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी होती. तर, अभिनेत्री कायनात अरोरा ही तिची चुलत बहीण आहे.

भारतीने मुंबईतील जुहू येथील 'मानेकजी कूपर हायस्कूल'मध्ये शिक्षण घेतले. इयत्ता ९ वीत असतानाच अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. बाहुलीसारखं देखणं रूप आणि चुलबुली अंदाजामुळे तिला सिनेसृष्टीतून ऑफर्स मिळत गेले.

साऊथ सिनेसृष्टीत अभिनयाचा डंका गाजवल्यानंतर तिने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्याकाळी बॉलीवूडचे मोठमोठे दिग्दर्शक तिला चित्रपटासाठी साइन करण्यास उत्सुक असायचे. भारतीचा पहिला बॉलीवूड चित्रपट १९९२ साली प्रदर्शित झालेला 'विश्वात्मा' होता. त्या काळी 'सात समुंदरपार...' हे गाणं प्रचंड गाजलं. त्यानंतर 'शोला और शबनम', 'दिवाना', 'दिल का क्या कसूर', 'रंग', 'शतरंज'; यासह अनेक चित्रपटांमध्ये तिने कमालीची भूमिका साकारली.

गोविंदासोबतचा 'शोला और शबनम' हा चित्रपट नव्वदच्या काळी प्रचंड गाजला. मुख्य म्हणजे या चित्रपटातील गाणी आजही तितकेच आवडीने ऐकली जातात. याच चित्रपटादरम्यान तिची ओळख दिग्दर्शक-निर्माता साजिद नाडियाडवालाशी झाली. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. १० मे १९९२ रोजी त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचं ठरवले. पण तिच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ नये म्हणून लग्न गुप्त ठेवण्यात आले होते.

एका मुलाखतीत तिच्या आईने दिव्याच्या अपूर्ण स्वप्नांबद्दल सांगितले होते. 'भाऊ कुणाल आणि वडिलांवर तिचे विशेष जीव होते. वडिलांना वर्ल्ड टूरवर घेऊन जाण्याचे तिचे स्वप्न होते. शिवाय त्यांना एक मर्सिडीज गाडी तिला घेऊन द्यायची होती. पण तिच्या या इच्छा अपूर्ण राहिल्या.'

अभ्यासाविषयी मीता म्हणतात, 'दिव्या अभ्यासात मुळीच हुशार नव्हती. तिला नीट हिंदी वाचताही येत नव्हते. अभ्यास करावा लागणार नाही, म्हणून तिने चित्रपटाची ऑफर स्वीकारली होती.'

लग्नाविषयी त्या पुढे म्हणाल्या, 'वडील लग्नाला परवानगी देणार नाही, या भीतीपोटी तिने तिच्या वडिलांना न सांगता साजिदसोबत लग्न केले होते. पण लग्नाच्या दिवशी दिव्याने आईला फोन करुन लग्नात बोलावले होते. पण वडिलांना न सांगता लग्न करत असल्यामुळे मी ही लग्नात येण्यास नकार दिला.' मीता भारती यादेखील आता या जगात नाहीत. काही वर्षांपूर्वी त्यांचेही निधन झाले.

दिव्याचा मृत्यू कसा झाला याबाबत आजही एक गूढ कायम आहे. काहींनी दिव्याने आत्महत्या केल्याचे सांगितले, तर काहींनी हा एक अपघात असल्याचे म्हटले. पण दिव्या छतावरून कशी पडली, तिचा मृत्यू आत्महत्या, खून की केवळ अपघात, ही बाब अजूनही गूढच आहे.