दिवाळीत फराळाचे पदार्थ कमीतकमी तेलात तळण्यासाठी ५ टिप्स- पैशांचीही बचत-तब्येतही ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2024 04:40 PM2024-10-18T16:40:10+5:302024-10-18T18:09:31+5:30

दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे (Diwali Celebration 2024). त्यामुळे घरोघरी कोणकोणते पदार्थ तयार करायचे, त्यासाठी काय सामान आणायचे याची तयारी आता सुरू झाली आहे.

दिवाळीच्या फराळात अनारसा, करंज्या, चकल्या, शेव, शंकरपाळे असे जे पदार्थ आपण करतो, त्या सगळ्यांसाठी तेल लागते. म्हणूनच दिवाळीच्या काळात तेल खूपच जास्त लागत असल्याने किराणा सामानाचं बजेट कोलमडतं, अशी अनेकींची तक्रार असते.

म्हणूनच दिवाळीचा सगळा फराळ कमीतकमी तेलात तळून व्हावा म्हणून काय करावे ते एकदा पाहा.

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फराळ तळण्यासाठी कधीही खूप मोठी कढई घेऊ नका. आकाराने लहान आणि पसरट नसणाऱ्या खोलगट कढईचा उपयोग फराळ तळण्यासाठी करा. जेवढी पसरट, मोठी कढई घ्याल, तेवढे जास्त तेल लागेल.

पदार्थ तळायला सुरुवात करण्याआधी गरम तेलामध्ये जर थोडे मीठ टाकले तर तो पदार्थ तेल कमी पितो.

तसेच जर शक्य असेल त्या पदार्थांमध्ये थोडा बेकिंग सोडा घाला. यामुळे पदार्थ तर छान फुलतोच पण तो तेलकटही होत नाही. त्यामुळे कमी तेलात जास्त पदार्थ तळून होतात.

कोणताही पदार्थ तळताना तो मध्यम आचेवर तळावा. मोठ्या आचेवर तळल्यास तेल खूप जळते तसेच पदार्थ जळतो.

कोणताही पदार्थ तळताना जर त्या पदार्थाला चिकटलेलं थोडं पीठ किंवा त्याचे कण कढईत पडले असतील तर ते लगेच काढून टाका. कारण असे कढईतले पदार्थ तेल खूप जास्त शोषून घेतात.

तळून झालेला पदार्थ झाऱ्यामध्ये घ्या. त्यातलं तेल पुर्णपणे निथळू द्या आणि त्यानंतरच तो पदार्थ कढईतून बाहेर काढा. तेलाची भरपूर बचत होईल.