वजन कमी करण्यासाठी एकवेळचं जेवण, नाश्ता बंद केला? वाचा तज्ज्ञांचा सल्ला- असं कराल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 04:30 PM2024-06-28T16:30:43+5:302024-06-28T16:35:27+5:30

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक जण डाएटिंगचा पर्याय निवडतात. त्यापैकी काही जण असे असतात जे कोणत्याही आहारतज्ज्ञांचा सल्ला न घेता मनानेच स्वत:चा डाएट प्लॅन ठरवतात आणि उपाशी राहतात.

मग उपाशी राहून वजन कमी करण्यासाठी काही जण नाश्ता बंद करतात तर काही जण रात्रीचं जेवण टाळतात. असं केल्याने काही दिवसांत तुमचं वजन निश्चितच कमी होईल, पण अशा पद्धतीने उपाशी राहणं तुमच्या तब्येतीसाठी किती धोकादायक ठरू शकतं, याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती एकदा वाचाच...

एशियन सेंटर ऑफ मेडिकल सायन्सचे डॉ. अमित मिगलानी यांनी याविषयी दिलेली माहिती एनडीटीव्हीने प्रकाशित केली आहे. त्यानुसार डॉक्टर असं सांगतात की तुम्ही सतत काही दिवस नाश्ता किंवा रात्रीचं जेवण बंद केलं तर त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकताे.

ॲसिडिटी खूप वाढल्याचा परिणाम तुमच्या गैस्ट्रो-इंटेस्टाइन सिस्टीमवर जाणवतो. यामुळे मग हळूहळू पचनशक्ती, मेटाबॉलिझम यांच्यावरही परिणाम होत जातो.

तसेच असं वारंवार उपाशी राहिल्याने आणि त्यामुळे सतत ॲसिडिटी वाढत गेल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलनही बिघडते.

यामुळे वजन कमी करण्यासाठी अशा पद्धतीने उपाशी राहणं पुर्णपणे चुकीचं आहे. डाएटिंग करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतलाच पाहिजे, असंही डॉ. मिगलानी सांगतात.