पावसाळ्यातल्या संसर्गजन्य आजारांना दूर ठेवणाऱ्या गुणकारी रानभाज्या, यंदा खा-बघा ५ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 05:43 PM2022-08-20T17:43:27+5:302022-08-20T17:49:52+5:30

पावसाळा आणि हिवाळ्याचा सुरुवातीचा काळ हा रानभाज्यांच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असतो. या काळात भरपूर प्रमाणात रानभाज्या उपलब्ध असतात. रानभाज्या वर्षातील काही महिनेच मिळत असतात. त्यामुळे मिळतात, तोपर्यंत पुरेशा प्रमाणात खाऊन घ्याव्यात. कारण त्यांच्यामध्ये भरपूर पोषणमुल्ये असतात. खाली दिलेल्या या अशाच काही रानभाज्या आणि त्यांचे फायदे.

कर्टोली- या भाजीमध्ये प्रोटीन्स, आयर्न, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त. पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही फायदेशीर

अळू- यामध्ये व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हृदयराेगाचा आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. हाडांना बळकटी देण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही उपयुक्त.

आघाडा- पावसाळ्यात वारंवार होणारे अपचन, पोटदुखी, वात असा त्रास कमी करण्यासाठी उपयुक्त. आघाड्याची पावडरही अनेक आयुर्वेदिक औषधींमध्ये वापरली जाते. मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठीही फायदेशीर.

टाकळा- सर्दी, ताप, खोकला असे संसर्गजन्य आजार कमी करण्यासाठी ही भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच अनेक त्वचाविकारांवरही टाकळा प्रभावी ठरतो.

हादगा- सर्दी, डाेकेदुखी कमी करण्यासाठी हादग्याची भाजी तसेच हादग्याच्या फुलांचे रायते उपयुक्त ठरते. पण ही भाजी प्रमाणात खावी. अन्यथा पोटदुखीचा त्रासही होऊ शकतो.

अंबाडी- या भाजीमध्ये व्हिटॅमिन ए, लोह, झिंक भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ही भाजी नेत्रविकार दूर करण्यासाठी तसेच अशक्तपणा कमी करण्यासाठी मदत करते. या भाजीमध्ये व्हिटॅमिन्सही भरपूर असतात.

चंदनबटवा- बद्धकोष्ठता, अपचन, पोटात वारंवार गॅसेस होणे, या सगळ्यांवर उत्तम घरगुती उपाय म्हणजे चंदनबटव्याची भाजी खाणे. या भाजीमध्ये फायबर तर भरपूर प्रमाणात असतातच, पण खनिजे आणि व्हिटॅमिन्सही पुरेशी असतात.

कुर्डू- जुनाट खोकला, कफ कमी करण्यासाठी फायदेशीर असते.