स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावी, स्टिलची-तांब्याची-मातीची की नॉन स्टिक? चव आणि पोषणावर त्याचा काय परिणाम होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 04:54 PM2022-12-29T16:54:01+5:302022-12-29T17:23:51+5:30

9 Best Cookware & Utensils for health : आपण ज्या भांड्यात अन्न शिजवतो त्याचा पदार्थाच्या चवीवर आणि पोषणावरही परिणाम होतोच.

जेवण हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक असतो. जेवण जेवढे स्वादिष्ट आणि चांगल्या चवीचे असेल तर आपल्याला ते आवडीने खाण्याची इच्छा होते. जेवण स्वादिष्ट बनवण्यासाठी गृहिणी वेगवेगळ्या धातूंपासून तयार केलेल्या भांड्यांचा वापर करतात. आपण आपल्या रोजच्या वापरात अ‍ॅल्युमिनिअम, तांबे, लोखंड, काच, सिरॅमिक यांसारख्या धातूंपासून बनविलेल्या भांड्यांचा वापर करतो. पूर्वीचे लोक जसं लक्षपूर्वक आणि शांतपणे जेवण करायचे तसे आता फारच कमीजण करतात, त्यामुळे आपण कशातून जेवतोय हे लक्षपूर्वक पाहणं सोडाच, आपण काय जेवतोय याकडेही आपण बऱ्याचदा म्हणावं तितकं लक्ष देत नाही. सध्या आपण जी भांडी वापरतो त्याचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि स्वयंपाक करण्यासाठी व जेवताना कोणत्या धातूची भांडी वापरावी याविषयी जाणून घेऊया (9 Best Cookware & Utensils for health).

चांदी हा एक शीतल धातू आहे. जो शरीराला आंतरिक थंडावा देतो. चांदीमुळे शरीर शांत राहते. चांदीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने मेंदू तल्लख होतो, डोळ्यांचे आरोग्य वाढते, दृष्टी वाढते आणि याशिवाय पित्तदोष, कफ आणि वायुदोष नियंत्रित राहतो. चांदीच्या पेल्यातून पाणी पिणंही फायदेशीर समजलं जातं कारण चांदीच्या पेल्याने पाणी प्यायल्यामुळे त्या पाण्यात जर काही भेसळयुक्त घटक असतील तर ते निघून जाऊन ते पाणी शुद्ध होतं.

तांब्याच्या भांड्याचा उपयोग पोटातील गॅसची समस्या दूर करण्यासाठी होतो. या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे स्मरणशक्ती वाढते. शिवाय लिव्हर संबंधित जे काही आजार असतील तर ते देखील दूर होतात.तांब्याच्या भांड्यांतून जेवल्यामुळे आपलं वजन कमी होते, शरीर डिटॉक्स होतं, हिमोग्लोबीन सुधारतं, पचनशक्ती सुधारते, हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्य सुधारतं, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि त्वचा निरोगी राहते.

स्टेनलेस स्टीलमध्ये असलेलं लोह शरीरासाठी उपयुक्त असतं. आपण स्टीलच्या भांड्यांमध्ये काहीही घेऊन खाऊ-पिऊ शकतो. स्टीलच्या भांड्यात जेवल्याने हिमोग्लोबीन वाढायला आणि अ‍ॅनेमियासारख्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत होते.

पितळेच्या भांड्यात जेवण तयार केल्याने आणि जेवल्याने कृमी रोग, कफ आणि वायुरोग नाहीसा होतो. पितळेच्या भांड्यात जेवण बनवल्याने केवळ ७% पोषक तत्व नष्ट होतात.

लोखंडी कढई, तवा यांचा वापर पदार्थ बनवायला केल्यामुळे शरीरातलं हिमोग्लोबीन सुधारतं आणि रक्तपेशी वाढायला मदत होते. मात्र लोखंडाच्या कढईत भाजी केलीत तर भाजीत लोह उतरून त्याचा रंग बदलेल. सांबार, रस्सम असे आंबट पदार्थ लोखंडाच्या भांड्यात बनवू नका. नाहीतर, त्या लोखंडाची पदार्थांवर रिऍक्शन होऊन त्यांची चव देखील बदलेल.

हल्ली सिरॅमिकच्या भांड्यांना बरीच चलती आहे. सिरॅमिकच्या भांड्यांमध्ये कोणतेही केमिकल्स नसल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सिरॅमिकची भांडी वापरणं हा चांगला पर्याय आहे.

मातीच्या भांड्यांमध्ये जेवण तयार केल्याने किंवा जेवल्याने शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. आयुर्वेदानुसार, जर भोजन पौष्टिक आणि स्वादिष्ट बनवायचे असेल तर ते हळू हळू शिजवले पाहिजे. मातीच्या भांड्यात जेवण तयार होण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, परंतु आरोग्याला त्यापासून पूर्ण लाभ होतो. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्याने १००% पोषण तत्त्व मिळतात. मातीच्या भांड्यात बनविलेल्या पदार्थांचा स्वाद आणि चव देखील खूप सुंदर लागते.

काचेच्या भांड्यामध्ये कोणतीही रसायने नसतात, त्यांना गंध किंवा चव नसते. त्यामुळे ते सुरक्षित मानले जाते. काचेच्या भांड्यातून आपण कोणत्याही प्रकारचे अन्न खाऊ शकतो. मात्र, काचेचं भांडं तुटले-फुटलेले असू नये.

आपल्यापैकी बरेचजण अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करतात. परंतु शक्यतो या भांड्यांचा वापर कमी करावा. असे मानले जाते की या भांड्यामध्ये जेवण केल्यामुळे हळूहळू हाडे कमजोर होऊ लागतात शिवाय पचनक्रियेवर वाईट प्रभाव देखील पडतो. त्यामुळे या भांड्यात जेवणाचे शक्यतो टाळावे.