अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना कधी होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागितली वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 08:21 PM2023-08-02T20:21:08+5:302023-08-02T20:42:53+5:30

अद्याप कोणतीही निश्चित तारीख निश्चित करण्यात आलेली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे.

अयोध्या : पुढील वर्षी १६ ते २४ जानेवारी दरम्यान अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. मात्र, अद्याप कोणतीही निश्चित तारीख निश्चित करण्यात आलेली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे.

अयोध्येत त्या दिवशी एकच कार्यक्रम असावा आणि तोही अराजकीय असावा, असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मत आहे. याशिवाय, त्या कार्यक्रमासाठी कोणताही स्टेज बनवला जाणार नाही. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या विशेष पाहुण्यांना बोलण्यासाठी कमी वेळ दिला जाईल आणि त्या दिवशी कोणतीही जाहीर सभा आयोजित केली जाणार नाही.

इतकंच नाही तर या कार्यक्रमात इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित केले जाणार नसून, फक्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख नेते उपस्थित राहणार असून ५००० लोकांची बसण्याची व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

याचबरोबर, राम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे देशभरात प्रक्षेपण करण्याचीही तयारी सुरू आहे, जेणेकरून लोकांना हा ऐतिहासिक क्षण त्यांच्या गावातून, शहरातून आणि इतर ठिकाणांहून पाहता येईल. अयोध्येत राम मंदिर बांधणाऱ्या ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी २७ जुलै रोजी सांगितले होते की, ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी पंतप्रधानांना राम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेसाठी निमंत्रण पाठवले आहे.

या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी हजेरी लावल्यास जगभर देशाची प्रतिमा अधिक मजबूत होईल, असे या पत्रात म्हटले आहे. तसेच, या कार्यक्रमासाठी १६ ते २४ जानेवारी दरम्यानची तारीख निमंत्रण पत्रात देण्यात आली आहे, परंतु कार्यक्रमाची तारीख पंतप्रधानांच्या उपस्थितीवर अवलंबून असणार आहे, असेही ते म्हटले होते.

या कार्यक्रमासाठी १०,००० लोकांना निमंत्रण पाठवण्यात येणार असल्याचे चंपत राय यांनी सांगितले होते. दरम्यान, या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांसह देशातील विशेष अतिथी मोठ्या संख्येने मंदिर परिसरात उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी चोख बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, या वर्षी डिसेंबरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ट्रस्टने कामगार आणि तंत्रज्ञांची संख्या वाढवली आहे. आता वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चोवीस तास बांधकाम सुरू आहे.

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले की, राम मंदिर परिसरात आधी ५५० कर्मचारी काम करत होते, मात्र गेल्या काही आठवड्यात ट्रस्टने ही संख्या जवळपास १६०० पर्यंत वाढवली आहे. पूर्वी जे काम १८ तास चालायचे ते आता चोवीस तास केले जात आहे.

चंपत राय म्हणाले की ट्रस्टने डिसेंबरपर्यंत तळमजल्याचे काम पूर्ण करण्याची मुदत निश्चित केली आहे, जेणेकरून मंदिर जानेवारी २०१४ पर्यंत भाविकांसाठी खुले करता येईल. राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर २२ कोटी रुपये खर्च करून झाडे लावण्यात येणार आहेत. वनविभागातर्फे हंगामी फुलांसह विविध प्रकारची शोभिवंत झाडे लावून रामपथ, धर्मपथ आणि भक्तीपथाचे सौंदर्य वाढविण्यात येणार असल्याची माहिती चंपत राय यांनी दिली.