“तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुलं ते आधी सांगा”; माजी मंत्र्यांची योगींवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:54 IST2021-07-12T17:52:59+5:302021-07-12T17:54:12+5:30
लोकसंख्या नियंत्रणासाठी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने एक विधेयक आणले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्यात.

“तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुलं ते आधी सांगा”; माजी मंत्र्यांची योगींवर टीका
लखनऊ: लोकसंख्या नियंत्रणासाठी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने एक विधेयक आणले आहे. राज्य विधी आयोगाने उत्तर प्रदेश लोकसंख्या विधेयक २०२१ चा मसुदा तयार केला आहे. मात्र, यावरून आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायला लागल्या असून, योगी सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. यातच आता काँग्रेसच्या एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी योगी सरकारवर निशाणा साधत तुमच्या सरकारमधील मंत्र्यांना किती मुले ते आधी सांगा, अशी विचारणा केली आहे. (congress salman khurshid criticised yogi govt over population control law)
योगी सरकारने आणलेल्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकानुसार, दोनपेक्षा अधिक मुलंबाळं असणाऱ्या नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढता येणार नाहीत, सरकारी नोकरीसाठी ते पात्र नसतील, तसंच पदोन्नती तसंच सरकारकडून मिळणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. यावरून काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीयमंत्री सलमान खुर्शीद यांनी योगी सरकारवर खोचक टीका केली आहे.
BPCL खासगीकरणानंतर ८.४ कोटी LPG ग्राहकांना गॅस मिळणार नाही? पाहा, सरकारी नियम
त्यानंतरच विधेयक मंजूर करा
सलमान खुर्शीद यांनी कोरोना तपासणी केंद्राचे उद्घाटन केले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी योगी सरकारवर टीकास्त्र सोडले. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याआधी सरकारने जाहीर करावे की, त्यांच्या मंत्र्यांना किती मुले आहेत. त्यानंतर हे विधेयक मंजूर करावे, असे खुर्शीद यांनी म्हटले आहे.
जसे विचार करणार, तसेच बोलणे
सलमान खुर्शीद यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मनात जसे भाव, तसेच विचार आणि कृत्य केली जातात, या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी पलटवार केला आहे. दरम्यान, राज्य विधी आयोग सध्या राज्यातल्या लोकसंख्या नियंत्रण, स्थिरीकरण आणि कल्याण यासाठी काम करत असून, १९ जुलैपर्यंत यावर जनतेची मते मागवण्यात आली आहेत.