नवी दिल्ली- बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दलितांच्या मतांचं ध्रुवीकरण व्हावे, यासाठीच भाजपानं षडयंत्र रचून भीम आर्मीची स्थापना केली आहे. भाजपानं दलितांची मतं बसपाऐवजी भीम आर्मीला मिळावीत म्हणून चंद्रशेखर यांना वाराणसीतून निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे, असा आरोप मायावतींनी केला आहे. भीम आर्मीची स्थापना ही दलितांच्या मतांचं धुव्रीकरण करण्याच्या षड्यंत्रातून झालेली आहे.मायावतींनी रविवारी ट्विट करत भाजपाआडून चंद्रशेखर आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. दलितांच्या मतांचं ध्रुवीकरण करून भाजपाला फायदा व्हावा या उद्देशानंही भाजपानं भीम आर्मीच्या चंद्रशेखर यांना वाराणसीतून निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे. ही संघटना भाजपानं षड्यंत्रानं बनवली आहे. भाजपा दलितविरोधी मानसिकतेचं घाणेरडं राजकारण करत असल्याची टीकाही मायावतींनी केली आहे. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये मायावतींनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपानं गुप्तचर म्हणून चंद्रशेखर यांना बीएसपीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचं षडयंत्र यशस्वी झालं नाही. अहंकारी, निरंकुश आणि जातीयवादी भाजपाला सत्तेतून हटवण्यासाठी आपलं एक एक मत बहुमूल्य असल्याचंही मायावती मतदारांना उद्देशून म्हणाल्या आहेत.
"दलित मतांच्या धुव्रीकरणाच्या षडयंत्रासाठीच भाजपाकडून भीम आर्मीची स्थापना"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 15:11 IST