"मोदी-शहांचा पराभव होऊ शकतो; फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर..." 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 08:04 AM2021-08-23T08:04:29+5:302021-08-23T08:05:24+5:30

Sanjay Raut : लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या आयोजित 19 राजकीय पक्षांच्या बैठकीवर आपले व्यक्त केले आहे. 

Shiv Sena leader Sanjay Raut slams Narendra Modi and Comment on Opposition Party Meeting through Saamana Editorial | "मोदी-शहांचा पराभव होऊ शकतो; फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर..." 

"मोदी-शहांचा पराभव होऊ शकतो; फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर..." 

googlenewsNext

मुंबई : प. बंगालातील विधानसभा निवडणुकीत नरेंद्र  मोदी आणि अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले. मोदींची सभा व शहांचे निवडणूक व्यवस्थापन म्हणजे विजय पताका फडकण्याची खात्रीच, हा भ्रम ममता बॅनर्जींनी धुळीस मिळवला. मोदींच्या 19 सभा होऊनही प. बंगालात ममतांचाच झेंडा फडकला व शहांचे सर्व राजकीय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन पराभूत झाले. म्हणजेच मोदी-शहा यांचा पराभव होऊ शकतो. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांच्या आयोजित 19 राजकीय पक्षांच्या बैठकीवर आपले व्यक्त केले आहे. 

गेल्या तीन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरातील विरोधकांची एक महत्त्वाची बैठक बोलावली. यावेळी स्वातंत्र्य चळवळीने देशाला दिलेली मूल्ये मानणारे सरकार 2024 च्या लोकसभा निवडणुकांनंतर सत्तेवर आणायचे आहे, असा निर्धार करून बिगरभाजप पक्षांनी आपली धोरणे आखावीत, असे आवाहन सोनिया गांधी यांनी केले आहे. हे ध्येय आपण एकजुटीने साध्य करू. त्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्यायही नाही, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, या बैठकीवर आजच्या सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.

लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर...
विरोधी पक्षांची एक मोट बांधून 2024 च्या निवडणुकांना सामोरे जावे, असे विचार सुरु झाले आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षांची एक बैठक पार पडली. काँग्रेससह 19 राजकीय पक्ष या बैठकीत सामील झाले. 19 पक्ष एकत्र आले आणि त्यांनी विरोधी पक्षांची ‘मोट’ बांधण्यासंदर्भात चर्चा केली. त्या चर्चेतून कोणते फळ हाती लागले हे महत्त्वाचे. लोकशाही आहे म्हटल्यावर चर्चा तर होणारच, पण फक्त ‘चर्चा पे चर्चा’ नकोत तर देशासमोर एक ठोस कार्यक्रम घेऊन जाणे गरजेचे आहे.

जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार आणि आचाराने उपरे किंवा बाटगे
मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद ‘जत्रा’ सुरु केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्याशाप देण्याचेच काम सुरु आहे. या जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार व आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल-परवा भाजपात घुसले व मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले. हे उपरे भाजपचा प्रचार करीत फिरत आहेत व वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते त्या ‘जत्रे’त येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत, अशी एक गंमत महाराष्ट्रासह देशभरात सुरु असताना विरोधी पक्षांना अधिक विचाराने पावले टाकावी लागतील.

म्हणजेच मोदी-शहा यांचा पराभव होऊ शकतो
19 राजकीय पक्ष एकत्र आल्याने लगेच मोदींचे सरकार डळमळीत झाले व गेले या भ्रमात राहता येणार नाही. कारण या एकोणिसात अनेक पक्ष असे आहेत की, त्यांचे ओसाड पडके वाडे झाले आहेत. या पडक्या वाड्यांची डागडुजी करुन त्यांना बरे स्वरुप दिल्याशिवाय एकजुटीचे धक्के समोरच्यांना बसणार नाहीत. विरोधकांच्या एकजुटीचे प्रदर्शन करताना त्याची तटबंदी ढिसाळ पायावर असता कामा नये. प. बंगालातील विधानसभा निवडणुकीत मोदी आणि शहा यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करण्यासाठी आकाश-पाताळ एक केले. मोदींची सभा व शहांचे निवडणूक व्यवस्थापन म्हणजे विजय पताका फडकण्याची खात्रीच, हा भ्रम ममता बॅनर्जींनी धुळीस मिळवला. मोदींच्या 19 सभा होऊनही प. बंगालात ममतांचाच झेंडा फडकला व शहांचे सर्व राजकीय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन पराभूत झाले. म्हणजेच मोदी-शहा यांचा पराभव होऊ शकतो. ममता बॅनर्जी यांना जेरीस आणण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, न्यायालये व इतर सर्व यंत्रणांचा वापर आजही करीत आहेत. त्याविरोधातसुद्धा सगळ्यांनी एकवटले पाहिजे.

देशातील वातावरण विरोधी पक्षांना अनुकूल 
प. बंगालात मोदी-शहांना जंतर मंतर करता आले नाही तसे दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात राजभवनाची प्रतिष्ठा पणास लावूनही सरकार स्थापन करता आले नाही. तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात उत्तम सुरु आहे. प. बंगाल व महाराष्ट्रात जे घडले ते विरोधी पक्षाला मार्गदर्शक आहे. भाजपचा पराभव निवडणुकीच्या मैदानात आणि बुद्धिबळाच्या पटावरही करता येतो हे दोन राज्यांनी दाखवले. त्यासाठी मनात व मनगटात लढण्याची जिगर पाहिजे इतकेच. तामीळनाडूत द्रमुकचे स्टॅलिन जिंकले, केरळात डाव्यांनी विजय मिळविला. आज उत्तर प्रदेश, आसाम सोडले तर कोणत्या राज्यात भाजपचे सरकार आहे? मध्य प्रदेश, कर्नाटकातील सरकारे मोडतोड तांबा-पितळेतून निर्माण केलेली आहेत. बिहारात रडीचा डाव निवडणूक आयोगाच्या मदतीने झाला नसता तर तेजस्वी यादव भारी पडलाच होता. राज्याराज्यांत प्रादेशिक पक्ष जोरात आहेत. ओडिशा, आंध्र प्रदेशातील सरकारे ही दिल्लीत ‘ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी’ या महान विचारांची आहेत, पण एकंदरीत देशातील वातावरण विरोधी पक्षांना अनुकूल होत आहे.

नौटंकीविरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे 
फक्त जनता पक्षाच्या स्थापनेच्या काळात सत्ताधारी पक्षातून एक जगजीवनराम बाहेर पडले व देशाचे चित्र पालटले तसा एक जगजीवन बाबू धाडसाने राष्ट्रहितासाठी उभा राहिला पाहिजे. भविष्यात ते घडेलच घडेल. देशात शेतकऱ्यांचा प्रश्न उभा ठाकला आहे, महागाई-बेरोजगारी आहे. पेगॅससचे गांभीर्य सरकार समजून घेत नाही, पण कधी तालिबान्यांचे भय निर्माण करायचे तर कधी पाकड्यांची भीती घालून लोकांची मने तापवून भावनांचे खेळ करायचे. आज तालिबानी अफगाणिस्तानात रक्तपात घडवीत आहेत व इकडे भाजपचे लोक सांगतात, "हिंदुस्थानात मोदी आहेत म्हणून तालिबानी नाहीत. बोला, भारतमाता की जय!" हे असले उठवळ प्रचार करणाऱ्या ‘जत्रा’ मंत्री-संत्री करीत आहेत. या सगळ्या नौटंकीविरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. 

‘मोदी नामा’ची जादू उतरली
‘2024 चे लक्ष्य’ वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. ‘मोदी नामा’ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील!

Web Title: Shiv Sena leader Sanjay Raut slams Narendra Modi and Comment on Opposition Party Meeting through Saamana Editorial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.