विशाल शिर्के -
पुणे :आठ वर्षांच्या मुलाला झालेल्या अतिदुर्मिळ आजारामुळे दोन्ही हात आणि पायाची बोटे जोडलेली... दोन्ही पाय गुडग्यापासून मागे मांडीला चिकटली. त्यावर करावी लागलेली शस्त्रक्रिया.. त्वचेला हात लावली तरी फाटेल अशी स्थिती....कायम जखमा वावरत असलेले शरीर...अशी गंभीर स्थिती असताना देखील औंध रुग्णालयाने त्याच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रावर ५४ टक्के अपंगत्व असल्याची नोंद केल्याचे ‘लोकमत’ने उघड केले होते. त्यानंतर प्रहार संघटनेने आंदोलनही केले. अखेरीस रुग्णालय प्रशासनाने संबंधित रुग्णाची पुन्हा तपासणी करीत ८० टक्के अपंगत्व असल्याचे सुधारित प्रमाणपत्र दिले असून, पूर्वी प्रमाणपत्र देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले आहे. हर्षल मंगेश कदम (वय ८, रा. रामदासनगर, चिखली) या मुलाला दुर्मिळ एपिडर्मोलिसिस बुलोसा हा जन्मजात आजार झाला आहे. त्याची हाता पायाची बोटे चिकटली असून, हात आणि पाय अगदी काडीसारखे आहेत. त्याला प्रत्यक्ष पाहणेही सामान्य माणसाला असह्य करणारे आहे. साध्या डोळ््यांनी त्याची विदारक स्थिती दिसत असानाही या मुलाला अवघे ५४ टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. संबंधित प्रमाणपत्र ३ जानेवारी २०१८ला दिले होते. त्यावर डॉ. एस. व्ही. खिलारे, अतिरिक्त सिव्हील सर्जन आणि सिव्हील सर्जन डॉ. आर.के. शेळके यांची स्वाक्षरी होती.