पुणे : शासनाच्या महत्त्वाकांशी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांनी वेग घेतला असून, आतापर्यंत २०० गावांत १३१६ कामे पूर्ण झाली, तर ७७२ कामे प्रगतिपथावर आहेत. जुलैअखेर ती पूर्ण होतील. या पावसाळ्यानंतर या कामांमुळे साधारण २८० दलघफू पाणी अडवले जाईल, अशी यंत्रणा कार्यान्वित होईल, असे जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाने नव्याने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले आहे. पुणे जिल्ह्यातील १९८ गावे पहिल्या टप्प्यात घेण्यात आली आहेत. ही गावे पावसाळ्यापूर्वी टंचाईमुक्त करण्याचा अराखडा तयार करण्यात आला असून, सन २०१९पर्यंत सर्व टंचाईग्रस्त गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमात असलेली तसेच ५० पेक्षा कमी पैसेवारी आलेली व टंचाईग्रस्त गावे यामध्ये निवडण्यात आली आहेत. जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील १५ ते २० गावे घेण्यात आली आहेत. यामध्ये अभियानात साखळी सिमेंट बंधारे, नालाबांध कार्यक्रम, नाला खोलीकरण, जल व कृषी संधारण, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण, पाणी अडवणे व जिरवणे यासाठी चरखोदाई अशी कामे करण्यात येत आहेत.जिल्ह्यातील २०० गावांमध्ये २ हजार ८८ कामे हाती घेतली होती. त्यांतील १३१६ कामे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत या कामांसाठी ५१ कोटी ८४ लाख रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे. ७७२ कामे प्रगतिपथावर आहेत. ती जुलैैअखेर पूर्ण होतील, असा विश्वास काटकर यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
२८0 दलघफू पाणी अडणार
By admin | Published: June 16, 2015 12:34 AM