पुणे : ‘बांगलादेशाच्या मुक्तिसंग्रामात आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवरून झेपावलेल्या सी-हॉक, एलिझे आणि चेतक या विमानांनी पूर्व पाकिस्तानातील कॉक्स बझार, चितगाव, खुलना, मोंगला, पुस्सुर अशा ठिकाणी तब्बल २८६ हवाईहल्ले करून बंदरे, हवाईतळ आणि लष्करी ठाणी उद्ध्वस्त केली. पश्चिम पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी अरबी समुद्रात भारतीय नौदलाने अशीच लक्षणीय कामगिरी केली. त्यामुळे संपूर्ण जगाला भारतीय नौदलाची ताकद दिसून आली,” असे प्रतिपादन व्हाईस ॲॅडमिरल विनोद पसरिचा (निवृत्त) यांनी गुरुवारी येथे केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि सेंटर फॉर ॲॅडव्हान्स स्ट्रॅटेजिक स्टडीज (कॅस) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘१९७१ च्या युद्धातील नौदलाची कामगिरी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष आणि कॅसचे संचालक एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त), सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, कमांडर इंद्रजित रॉय (निवृत्त), कॅसचे उपसंचालक मेजर जनरल शिशिर महाजन (निवृत्त) आणि सोसायटीचे साहाय्यक सचिव इंजिनिअर सुधीर गाडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
कमांडर इंद्रजित रॉय (निवृत्त) म्हणाले, “देशाच्या पूर्वेला असलेल्या बांगला देशाचा मुक्तिसंग्राम देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर लढला गेला. देशाच्या पश्चिमेला असलेल्या विशाल अरबी समुद्रात उत्तरेला पाकिस्तानचा समुद्रकिनारा आणि कराची हे एकमेव बंदर आहे. गुजरातमधील ओखापासून ते जवळ आहे. १९७१ सालच्या मार्च महिन्यात भारतीय नौदलाला आठ मिसाईल बोटी मिळाल्या होत्या. यातील दोन बोटींनी कराची आणि त्याच्या आसपास हल्ला केला. भारतीय नौदलाने या कारवाईत पाकिस्तानच्या पीएनएस पीएनएस आणि पीएनएस मुहाफिज या दोन युद्धनौकांना जलसमाधी दिली. अरबी समुद्रात भारतीय नौदलाने बजावलेल्या कामगिरीमुळे पाकिस्तानच्या कारवायांना पायबंद बसला आणि त्याचा फार मोठा परिणाम पूर्व आघाडीवर झाला.” अपूर्वा बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.