३४ गावांतील कर आकारणीबाबत शब्द पाळा; पालकमंत्री अजित पवार यांना सुप्रियाताईंचे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 11:07 AM2024-07-06T11:07:17+5:302024-07-06T11:07:47+5:30

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांमधील समस्यांसंदर्भात सुळे यांनी शुक्रवारी महापालिका भवनात बैठक घेतली...

34 keep the word about taxation in villages; Congratulations to Guardian Minister Ajit Pawar | ३४ गावांतील कर आकारणीबाबत शब्द पाळा; पालकमंत्री अजित पवार यांना सुप्रियाताईंचे साकडे

३४ गावांतील कर आकारणीबाबत शब्द पाळा; पालकमंत्री अजित पवार यांना सुप्रियाताईंचे साकडे

पुणे : समाविष्ट गावांतील मिळकतधारकांना जादा कर लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी-चिंचवडप्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर करू, असे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. आता आचारसंहिता संपली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा, त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या पुणे शहरातील विविध भागांमधील समस्यांसंदर्भात सुळे यांनी शुक्रवारी महापालिका भवनात बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे, माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुळे म्हणाल्या, समाविष्ट गावातील मिळकतधारकांना जास्त कर लावण्यात आला आहे, लोकसभा निवडणुकीपूर्वी या गावातील कर आकारणी पिंपरी चिंचवडप्रमाणे करण्याचा निर्णय झाला आहे. पण त्याची अजून अंमलबजावणी सुरू झालेली नाही. त्यासाठी नगरविकास विभागाकडेही पाठपुरावा करणार आहे. पालकमंत्र्यांनीही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी. म्हाळुंगे, रावेत भागात ४० मजली इमारती उभ्या राहत आहेत. या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही, असे असताना प्रचंड वेगात बांधकामे होत आहेत. त्यामुळे पुण्याचे पाणी, कचरा, रस्ते यांचे तज्ज्ञांकडून ऑडिट होणे आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती गंभीर होणार असे सुळे यांनी सांगितले.

कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम समन्वयाअभावी रखडले

‘महापालिकेत नगरसेवक नसल्याने नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणीच नाही, त्यामुळे समस्या गंभीर होत आहेत. या गावातील समस्यांवर मी दर महिन्याला बैठक घेऊन कामांचा पाठपुरावा करत आहे. कात्रज कोंढवा रस्ताच्या कामात महापालिका, राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वय नसल्याने हे काम रखडले आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

नगरसेवक नसल्यामुळे समस्या राहतात प्रलंबित

महापालिका तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नसल्याने नागरिकांना हक्काची माणसेच उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपल्या कामांसाठी कोणाकडे जायचे, पाठपुरावा करायचा हेच त्यांचा समजत नाही. त्यामुळे त्यांच्या समस्या प्रलंबित राहात आहेत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Web Title: 34 keep the word about taxation in villages; Congratulations to Guardian Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.