दौंड : तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे इच्छुक उमेदवार आपल्या वॉर्डातून चाचपणी करीत आहेत. एरवी कुणाशी न बोलणारे मात्र आता सर्वसामान्य जनतेशी बोलते झाले आहेत. एखाद्याच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांची विचारपूस करणे, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर आपल्या वॉर्डातून माझी उमेदवारी योग्य राहील का, असाही प्रश्न इच्छुक उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे. तर, काही महाभागांनी ओल्या पार्ट्या सुरू केल्या असल्याची वस्तुस्थिती आहे. तालुक्यात गिरीम, शिरापूर, लिंगाळी, नानवीज, सोनवडी, खानोटा, रावणगाव, नंदादेवी, बोरीबेल, खडकी, स्वामी चिंचोली, मळद, राजेगाव, वरवंड, गार, कुसेगाव, हातवळण, पाटस, कानगाव, गलांडवाडी, बोरीपार्धी, नानगाव, यवत, कासुर्डी, खामगाव, भांडगाव, खोर, मिरवडी, खुटबाव, पिंपळगाव, लडकतवाडी, टाकळी, गोपाळवाडी, वाळकी, पडवी या गावांतील निवडणुका प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार असल्याने गटातटाच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकींना महत्त्व आले आहे. आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे, ज्येष्ठ भाजपा नेते वासुदेव काळे, दौंड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे यांच्यासह अन्य राजकीय पक्ष नेमकी काय भूमिका घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात
By admin | Published: June 29, 2015 11:53 PM