पुणे : शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजार भाव मिळावा, यासाठी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुल मार्केट उभारण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठे वाशी येथे बाजारपेठ आहे. मुंबईत विमान, रेल्वे, जहाज यांची कनेक्टिव्हिटी असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक बाजार घटकाला खरेदी-विक्री करता येते. मुंबई हे टर्मिनल मार्केट आहे. यामुळे १ हजार एकरांमध्ये मुंबई परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुल मार्केट उभारणार असल्याचे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
स्वारगेट गणेश कला क्रीडा मंडळ येथे आयोजित दुसऱ्या मिलेट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कृषी पणन मंडळाचे संचालक विकास रसाळ, कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे, मंडळाचे माजी संचालक नारायण पाटील इ .उपस्थित होते. रावल म्हणाले, जगभरातील तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन मिळावे या भूमिकेतून भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले. तृणधान्याचा वापर हा एक वर्षापुरता मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तृणधान्याचे आहारात महत्त्वाचे स्थान असून, मार्केटिंगकडे लक्ष देण्याची गरज आहे.
यावेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीस पणनमंत्री यांनी प्रदर्शनात लावण्यात आलेल्या स्टॉलला भेटी देऊन पाहणी केली. यावेळी मिलेट जनजागृतीसाठी बाइक रॅली काढण्यात आली. या बाइक रॅलीस रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
हा तृणधान्य महोत्सव १२ जानेवारीपर्यंत सुरू असून, महोत्सवामध्ये राज्याच्या विविध भागांतून तृणधान्य उत्पादक, प्रक्रियामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट कंपन्या सहभागी झाल्या आहेत.