लोकमत न्यूज नेटवर्कघोडेगाव : गंगापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे डिंभे धरण डाव्या कालव्यात पाय घसरून सिद्धार्थ संतोष वारे (वय ९) हा मुलगा मंगळवारी (दि. ९) पडला आहे. पाटबंधारे विभागाने कालव्याचे पाणी कमी केल्यास त्याचा शोध लागू शकतो, अशी मागणी ग्रामस्थ करीत होते. मात्र कालव्याचे पाणी कमी करता येत नाही, अशी भूमिका पाटबंधारेने घेतल्याने तणाव निर्माण झाला. सायंकाळी उशिरापर्यंत मुलाचा तपास लागला नव्हता.मंगळवारी (दि. ९) दुपारी तीनच्या सुमारास सिद्धार्थ आजी किसाबाई हिच्यासोबत कालव्याच्या कडेला शेळ््या चरण्यासाठी गेला होता. आजी कपडे धूत असताना सिद्धार्थ पाय घसरून पाण्यात पडला. पाण्याला वेग असल्याने तो वाहत गेला. ग्रामस्थांनी मंगळवारी व बुधवारी (दि. ९ व १०) रात्रंदिवस कालव्याच्या कडेला फिरून त्याचा शोध घेतला. मात्र पाण्याच्या वेगामुळे त्याचा तपास लागू शकला नाही. कालव्याचे पाणी कमी केल्यास सिद्धार्थचा शोध लागेल, यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी कमी करावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली. यासाठी सुमारे ७० ग्रामस्थांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात येऊन सहायक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांची भेट घेतली. त्यांनी मुलाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू व पाणी कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधू, असे सांगितले. दरम्यान, कालव्याचे पाणी टाकळीहाजी परिसरात सुरू असून येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने येथे पाण्याचे आवर्तन सुरू आहे. हे पाणी बंद केल्यास पुन्हा टाकळीपर्यंत पाणी पोहोचवणे अवघड होईल. त्यामुळे हे पाणी बंद करणे शक्य नाही. तसेच पाण्याचा सर्व निर्णय जिल्हाधिकारी यांच्याकडे असल्याने यासाठी त्यांची परवानगी लागेल, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने मांडली.
दुसऱ्या दिवशीही मुलाचा शोध सुरूच
By admin | Published: May 11, 2017 4:22 AM