पुणे : जूनची सरासरी ओलांडून पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यात सुरू झालेली पाणीटंचाईची झळ आता परतीच्या पावसाने कमी केली आहे. श्रावणातही ४९ टँकरने जिल्ह्यात सुरू असलेला पाणीपुरवठा आता २० टँकरवर आला आहे. मात्र बारामतीच्या जिरायती भागात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.५ जूननंतर जिल्ह्यात मान्सून सक्र्रिय होऊन तो सरासरीच्या १६0.0६ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात मेअखेर सुरू असलेले ३२ टँकर झपाट्याने कमी होऊन ते १८ वर आले होते. मात्र, जुलै महिन्यात ५७.0५, आॅगस्ट महिन्यात ३४.६३ इतकाच पाऊस झाल्याने जिल्ह्यात पुन्हा ‘पाणी पाणी रे’ करण्याची वेळ आली. त्यामुळे पुन्हा जिल्हा प्रशासनाने टँकर वाढवून ते ४९ केले आहेत. मात्र, सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात परतीचा पाऊस सुरू झाला. सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत जिल्हात १८0.४७ मिलिमीटर पाऊस झाला असून, तो टक्केवारीत सरासरीच्या १२३. ५७ इतका आहे. जूनपासून आतापर्यंत ६४२.१७ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, तो टक्केवारीत सरासरीच्या ७५.९३ इतका आहे. अजून २५ टक्के पाऊस कमी झाला आहे. पाणीसाठ्यांतील तूट मात्र चिंताजनकच आहे. (प्रतिनिधी)माळेगाव : पाठ फिरवलेल्या पावसाने जाता-जाता दमदार हजेरी लावली. परंतु, समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्तच आहेत. शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र, मोठ्या जनावरांचे काय करावे? असा प्रश्न बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांसमोर आवासून उभा आहे. दरम्यान, चारा छावण्या उभ्या करण्याकरिता सरकारी आदेशानुसार जनावरांच्या सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात आहे. परंतु शेतकरीवर्गामधून ‘चारा छावण्या नको,डेपो द्या’ अशी मागणी जोर धरू लागली आहे. चारा छावणी झाल्यास लोकांना आपली जनावरे छावणीमध्ये घेऊन जावी लागतात. यामुळे त्याठिकाणी घरातील एक व्यक्ती अडकून पडते. एकीकडे जनावरांचा जीव वाचविण्यासाठी धडपड, तर दुसरीकडे स्वत:चे पोट भरण्यासाठीची वणवण. त्यातच छावणीवर थांबणाऱ्या व्यक्तीसाठी खाण्या-पिण्याची सोय करावी लागते.दूध काढणे व विक्रीची समस्या, जनावरांना साथीच्या रोगांचा होणारा प्रादुर्भाव व इतर येणाऱ्या अडचणी यांमुळे शेतकऱ्यांमधून चारा डेपोची मागणी होत आहे.२०१२ साली चारा डेपो उघडण्यात आले होते. परंतु अडचणी आल्याने तीन महिन्यांमध्येच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. बारामती तालुक्यातील ६४ ते ६७ गावे दुष्काळसदृश आहेत. पूर्वीसुद्धा ६४ गावांकरिता छावण्या उभारण्यात करण्यात आल्या होत्या. या वर्षीही ज्या गावांची आणेवारी ५० टक्केच्या आत असेल तेथे चारा डेपो किंवा छावण्या उभ्या राहतील. याकरिता जनावरांचा सर्व्हे केला जात आहे. माळेगाव बुद्रुक व माळेगाव खुर्द हा भाग बागायती असल्याने सध्या चाऱ्याची समस्या दिसत नाही. परंतु पाऊस न झाल्यास चाऱ्याची कमतरता निर्माण होईल, असे माळेगावचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गाडे यांचे मत आहे. (वार्ताहर)
वणवण थांबली; चारा प्रश्न गंभीरच!
By admin | Published: September 25, 2015 1:23 AM