बाणेर: धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आम आदमी पक्षातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. सत्तेच्या नादात सामान्य माणसाला या शासनाकडून काय अपेक्षित आहे, हेच शासन विसरले आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांचा जवळचा व व्यावसायिक भागीदार आहे. आर्थिक खंडणीच्या कारणास्तव ही हत्या झालेली आहे. यातील आर्थिक व्यवहाराचे आकडे भाजपच्याच आमदारांनी मांडलेले आहेत. म्हणूनच धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणात वाल्मीक कराड सोबत सहआरोपी करावे व त्याअनुषंगानेच ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) अंतर्गत गुन्हे नोंदवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या नीतीभ्रष्ट लोकांचे सरकार असून, धनंजय मुंडेंसह संजय राठोड, तानाजी सावंत, माणिकराव कोकाटे, छगन भुजबळ, अजित पवार, राणे, जयकुमार गोरे, अशा सर्व कलंकित, भ्रष्ट प्रवृत्तीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत. राज्यात मागील काही काळामध्ये महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडलेल्या असून, या सर्व केसेस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवल्या जाव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आंदोलनात पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद कीर्दत, शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, निखिल खंदारे, शिवाजी डोलारे, सुभाष करांडे, गजानन भोसले, संदेश दिवेकर, शीतल कांडेलकर, सचिन गरूड, कुमार धोंगडे, मनोज शेट्टी, मनोज एरंडकर, गुणाजी मोरे, अमित म्हस्के, उमेश बागडे, किरण कांबळे, नौशाद अन्सारी, प्रशांत कांबळे, सुरेखा भोसले, संजय कटारनवरे, इम्रान खान, मंगेश आंबेकर, विकास चव्हाण, सोमनाथ भगत, शंकर थोरात, सतीश यादव, चंद्रकांत गायकवाड, अभिजित बागडे, नीलेश वांजळे, अली सय्यद यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.