लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पेटलेल्या कच-यामुळे वीज वाहिन्या पेटल्याने सिंहगड रस्ता परीसरातील वीज पुरवठा खंडीत झाला. ऐन उन्हाच्या तडाख्यामध्ये वडगाव, धायरी गाव, नांदेड गाव आणि सिंहगड रस्त्यावरील नागरीकांना त्रास सहन करावा लागला. नांदेड सिटीजवळील वडगाव पुलाजवळ असलेल्या महावितरणच्या वीज यंत्रणेजवळ टाकण्यात आलेला कचरा सकाळी साडेअकराच्या सुमारास पेटला. तत्पुर्वी वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणचे कर्मचारी वीजयंत्रणेची तपासणी करीत होते. त्यावेळी कच-यामुळे वीज वाहिन्या जळत असल्याचे निदर्शनास आहे. याबाबत माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीमध्ये उच्चदाबाच्या ५ वीज वाहिन्या जळाल्या. खडकवासला उपकेंद्राच्या दोन इनकमिंग वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी या उपकेंद्रातील तीन आऊटगोईंग वाहिन्यांचाही वीजपुरवठा खंडित झाला. धायरी गाव, वडगाव, नांदेड गाव, सिंहगड रस्ता या परिसरातील २५ हजार वीजग्राहकांना फटका बसला. महावितरणकडून या वीजवाहिन्यांची दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे.
कचरा पेटल्याने वीजवाहिन्या जळाल्या
By admin | Published: May 11, 2017 4:40 AM