मंचर : मंचर शहराबाहेरून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्याला शेतकऱ्यांचा असणारा विरोध कायम आहे. भूसंपादनाविरोधात घेतलेल्या हरकतींवर सुनावणी झाली, त्या वेळी ‘आम्हाला मोबदला नको, बाह्यवळण रद्द झाले पाहिजे,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी नव्याने हरकती नोंदविल्या आहेत. बाह्यवळण रस्त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी हरकती नोंदविल्या होत्या. त्यावर घोडेगाव तहसील कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. उत्तर पुणे जिल्हा शेतकरी बचाव कृती समितीचे डॉ. सुहास कहडणे, सतीश बेंडे, पंडित निघोट, सचिन बाणखेले, सचिन खानदेशे, संदीप बेंडे, धीरज समदडिया, सचिन चिंचपुरे, गणेश खानदेशे आदी बाधित शेतकरी या वेळी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी नव्याने हरकती नोंदविल्या आहेत. त्यात बाह्यवळण रस्ता का नको, याबाबत म्हणणे मांडले आहे. विशेष भूसंपादन अधिकारी संजय पाटील, मंचरचे गावकामगार तलाठी हेमंत भागवत व भूमि अभिलेख कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी बाह्यवळण रद्द करण्याची आग्रही मागणी केली. ‘मोबदला हा आम्हाला विषयच नको आहे. कोणत्याही परिस्थितीत बाह्यवळण रद्द झालेच पाहिजे,’ अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. शांततेच्या मार्गाने अधिकाऱ्यांनी आमची मागणी ऐकावी तसेच बाह्यवळण रद्द करावे, असे उपस्थित शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. या वेळी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या नावाने एक निवेदन, संजय पाटील यांच्याकडे सुपूर्त केले. (वार्ताहर)
बाह्यवळण रद्द झालेच पाहिजे
By admin | Published: September 25, 2015 1:13 AM