बारामती : पवार कुटुंबाबाबत माझ्या मनात काल, आज आणि उद्याही मनभेद आणि मतभेद कधीच नव्हते. हे सर्वांना माहिती आहे. कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि समाजातील जबाबदाऱ्या उंबरठ्याच्या बाहेर, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत केलेल्या एका विधानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री पवार यांनी ताटात पडलं काय आणि वाटीत पडलं काय..? असं वक्तव्य बारामतीत बोलताना नुकतेच केले आहे.
खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अद्याप पालकमंत्र्यांचा तिढा सुटला नाही. या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी अनेक वर्ष सत्ता जवळून पाहिली आहे. मात्र पालकमंत्री पदावरून एवढी रस्सीखेच कधीही मी आजवर पाहिली नाही. मात्र पालकमंत्रिपदात काय गूढ आहे, हे मला आजवर समजलेले नाही, असं सुळे म्हणाल्या.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर विचारले असता सुळे म्हणाले की. खरं तर याचे उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले. महायुतीचेच सुरेश धस, साळुंखे यांनी राजीनाम्याची मागणी करूनही मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेत नाहीत. याबाबत त्यांनाच विचारावे लागेल, असेही सुळे यांनी यावेळी नमूद केले. दिल्लीत होत असलेल्या निवडणुकीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल यांना अनेक मतदार कुठून आले आहेत हेही माहीत नाही. याची यादीच त्यांनी सादर केली. त्यामुळे निवडणूक आयोगाला आमची एवढीच विनंती आहे की, पारदर्शकपणे निवडणूक व्हावी, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमादरम्यान निवेदन घेऊन आलेल्या कार्यकर्त्याला उद्देशून, तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झाला, असे वक्तव्य केले होते. तसेच संजय गायकवाड यांनीही हजार दोन हजार रुपये तुम्ही विकले गेला आहात, असे वक्तव्य केले होते. याबाबत सुळे यांना विचारले असता ‘राम कृष्ण हरी’ असे म्हणत एका वाक्यात प्रतिक्रिया दिली.