मोशी : शेतजमीन उद्योगनगरीच्या विकासाला देऊन अल्पभूधारक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांवरच बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. सर्व पात्रता पूर्ण करूनही स्थानिक म्हणून नोकरी पासून डावलल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. स्थानिक मुले कंपनीत दंडेलशाही करीत असल्याने त्यांना नोकरी दिली जात नाही, असे कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. उद्योगनगरीतील भोसरी एमआयडीसी, तळवडे, निगडी, पिंपरी चिंचवड, हिंजवडी परिसर या परिसरात व उद्योगनगरीनजीक चाकण, महाळुंगे, निघोजे, आळंदी फाटा आदी ठिकाणी असलेल्या बड्या कंपन्यांमधून स्थानिकांना पात्रता असूनही डावलले जाते. या प्रश्नाबाबत एका खासगी बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, स्थानिक मुले बदलून दिलेल्या शिफ्टमध्ये काम करू इच्छित नसतात. त्यात परराज्यातील वा जिल्ह्यातील मुले वरिष्ठ असल्यास त्यांचा हुकूम ऐकणे या मुलांना कमीपणाचे वाटते. त्यात कामावरून तणाव, वाद निर्माण झाल्यास थेट स्थानिक म्हणून दंडेलशाही दाखवून वरिष्ठांना मारहाणही होते. यावर उपाय म्हणूनच स्थानिकांना न घेण्याचा पायंडाच कंपनीत पाडला जातो. (वार्ताहर)> स्थानिकांना नोकरीमध्ये सामावून घेण्याकरिता त्यांना आवश्यक ते कौशल्य आत्मसात करण्याकरिता शासनाने परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारल्या आहेत. येथील स्थानिक मुले ही येथून प्रशिक्षण पूर्ण करत असतात. तद्नंतर त्यांना सहा महिन्यांच्या अनुभव प्रशिक्षणास सरकारी, निमसरकारी वा काही बड्या कंपन्यांमध्ये रुजू करण्यात येते. मात्र हा सहा महिन्यांचा प्रशिक्षण काळ संपल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने कायम स्वरूपी रोजगार मिळविण्याचा शोध सुरू होतो. उद्योगनगरीतील अशा बेरोजगारांची संख्या शेकडोंच्या वर असून, दर वर्षी त्यात भरच पडत आहे. तेव्हा त्यांना स्थानिक म्हणून नोकरी नाही या वास्तवाला सामोरे जावे लागते. दंडेलशाही करणारा कोणी एक असतो. परंतु त्याच्यावरील कारवाईमध्ये इतर स्थानिक तरुणही भरडले जातात. सर्वांनाच नोकरीची दारे बंद करणे अयोग्य आहे.
स्थानिक मुले झाली बेरोजगार
By admin | Published: July 09, 2015 2:29 AM