पुणे: लम्पी हा जनावरांना हाेणारा संसर्गजन्य आजार संपूर्ण राज्यात वेगाने पसरत असून अवघ्या दहा दिवसांतच या राेगाने हातपाय सर्वच जिल्हयांत वेगाने पसरले आहेत. दहा दिवसांपूर्वी म्हणजेच ११ सप्टेंबरला राज्यात ३१० गावांमध्ये २३८७ गुरांना बाधा झाली हाेती व ४१ गुरांचा मृत्यू झाला हाेता. दहा दिवसानंतर २० सप्टेंबर राेजी थेट १० हजारांहून अधिक गुरांना बाधा झाली असून २७१ गुरांचा मृत्यू झाला आहे. काेराेना जसा वेगाने फैलावत हाेता तसाच हा आजार देखील वेगाने गुरांमध्ये फैलावत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात सर्वप्रथम ४ ऑगस्टला जळगाव जिल्ह्यातील लम्पीची लागण झाली. त्यानंतर हा राेग झपाट्याने ११ सप्टेंबरपर्यंत अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, नाशिक व एकूण १९ जिल्ह्यांमध्ये पाेहोचला. आता ताे जळगाव, अहमदनगर, धुळे, अकोला, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलडाणा, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, परभणी, सोलापूर, वाशिम, नाशिक, जालना, पालघर, ठाणे, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, हिंगोली व रायगड अशा 27 जिल्ह्यांमधील 1108 गावांमध्ये १० हजाराहून अधिक जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधितांपैकी 3 हजार 291 जनावरे बरी झाली असून, उर्वरितांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, ११ सप्टेंबरपर्यंत केवळ ४१ गुरांचा मृत्यू झाला हाेता ताे आता जळगांव 94, अहमदनगर 30, धुळे 9, अकोला 46, पुणे 22, लातूर 3, औरंगाबाद 5, सातारा 12, बुलडाणा 13, अमरावती 17, कोल्हापूर 9, सांगली 2, वाशिम १, जालना १, ठाणे 3,नागपूर 3 व रायगड 1 अशा 271 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 49. 83 लाख लसीच्या मात्रा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या लस मात्रांपैकी बाधित क्षेत्राच्या 5 कि.मी. परिघातील 1108 गावातील 16.45 लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले असून लसीकरण मोहिम सुरु आहे. त्यानंतर प्राधान्याने गोशाळा व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे, अशी माहीती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
लम्पी संसर्गाची तुलनात्मक आकडेवारी
लम्पीचा तपशील - ११ सप्टेंबर २० सप्टेंबर१. बाधित गुरांचा संख्या - २३८७ १०,००० २. बाधित गुरांचे मृत्यू - ४१ २७१३. बाधित गावांची संख्या ३१० ११०८४. लसीकरण - ६ लाख १६ लाख