पुणे : सध्या राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यातही थंडी वाढत होती. किमान तापमानात वाढ झाली असली तरी पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढू शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला.
देशामध्ये उत्तरेकडील राज्यांमधील थंडीचा कडाका कमी-अधिक होत आहे. नैर्ऋत्य राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर पंजाबपासून पश्चिम-मध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला असून, त्यातच पश्चिमी चक्रावातामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये हलक्या पावसासह हिमालय लगतच्या भागात हिमवृष्टी होत आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक भागात सोमवारी (दि. ६) किमान तापमानात वाढ झाली. पण रात्री आणि सकाळी थंडी चांगलीच जाणवत होती. सोमवारी राज्यातील बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १० अंशांपेक्षाही अधिक नोंदवले गेले. त्यामुळे काही भागात थंडीचा कडाका कमी जाणवला.
राज्यातील किमान तापमान
पुणे : १३.८
जळगाव : ११.०
नगर : १२.३
महाबळेश्वर : १४.७
सोलापूर : १७.२
मुंबई : १९.६
परभणी : ११.५
गोंदिया : ११.४
नागपूर : ११.२
वर्धा : ११.९