पुणे : सध्या राज्यातील बहुतांश ठिकाणी थंडी कमी झाली आहे. काही भागांत ढगाळ वातावरण असून, पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे, तसेच काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा हवामान विभागाचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे.पुढील तीन दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे, तसेच तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता आहे. विशेषतः नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले.येत्या २७ डिसेंबरला मध्य महाराष्ट्र व मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ गारपिटीचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये गारपिटीची शक्यता आहे.राज्यामध्ये बुधवारी (दि.२५) आणि गुरुवारी (दि.२६) ढगाळ वातावरणासह थंडी कमी होऊन संपूर्ण महाराष्ट्रात उबदारपणा जाणवू शकतो. मात्र, वर्षअखेरीस म्हणजे ३० डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीचा कडाका जाणवण्याची शक्यता असल्याचे खुळे यांनी सांगितले.
Maharashtra Weather Updates : ऐन हिवाळ्यात पावसाला पोषक वातावरण, गारपिटीचाही इशारा
By श्रीकिशन काळे | Updated: December 24, 2024 20:07 IST