पुणे: माता रमाई ही त्याग, समर्पण आणि निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी केलेल्या त्यागाच्या प्रेरणेतून बाबासाहेबांसारखे व्यक्तिमत्त्व घडले. माता रमाईंची बाबासाहेबांना खंबीर साथ होती, म्हणून बाबासाहेब निश्चिंत मनाने कार्य करू शकले, असे मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकातर्फे महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या ८६ व्या स्मृतिदिनानिमित्त मैथिली आडकर आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप बर्वे यांना ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते छोटेखानी कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. त्या वेळी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे होते. नगरसेविका लता राजगुरू, अॅड. प्रमोद आडकर, महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे निमंत्रक विठ्ठल गायकवाड, कुणाल राजगुरू आदी या वेळी उपस्थित होते.