पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुलाच्या कठड्यावर रिक्षा आदळून प्रवासी तरुणाचा मृत्यू झाला. रिक्षाचालकाने अल्पवयीनच्या ताब्यात रिक्षा चालवण्यास दिल्याने अपघाताची घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी रिक्षा चालकासह अल्पवयीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
रितेश शिवाजी गायकवाड (१९, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालक जालिंदर बबन साळुंके (३५, रा. साईबाबा मंदिराजवळ, कात्रज) याच्यासह एका अल्पवयीनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई विठ्ठल चिपाडे (३९) यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक साळुंके, अल्पवयीन, गायकवाड हे ओळखीचे आहेत. १५ एप्रिल रोजी रिक्षातून कात्रज-कोंढवा रस्त्यावरून निघाले होते. त्या वेळी रिक्षाचालक साळुंकेने अल्पवयीनाला रिक्षा चालवण्यास दिली होती. भरधाव रिक्षेवरील नियंत्रण सुटल्याने रिक्षा पुलाच्या कठड्यावर आदळली. अपघातात रिक्षातील तरुण रितेश गायकवाड गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस तपासात रिक्षाचालक साळुंकेने अल्पवयीनला रिक्षा चालवण्यास दिल्याने अपघात घडल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक शेंडे पुढील तपास करत आहेत.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावर घडली. महेश मनोहर चव्हाण (२८, रा. साजूर, कराड, जि. सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नीलेश सुर्वे यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार चव्हाण हे बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास नगर रस्त्याने निघाले होते. खराडी बाह्यवळण मार्ग चौकात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार चव्हाण यांना धडक दिली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र ढावरे पुढील तपास करत आहेत.