पवनानगर: पवनाधरण परिसरातील दुधिवरे गावाच्या हद्दीमध्ये बुधवार (दि.४ ) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पवनाधरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या दोन पर्यटकांचा बोट उलटल्याने मृत्यू झाला आहे. पवनाधरण जलाशयात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बोटी फिरत असून त्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना आणि नोंदणी क्रमांक देखील नाहीत. मयूर रविंद्र भारसाके (वय २५) तर तुषार रविंद्र अहिरे (वय.२६ दोघेही सध्या रा.पुणे, मुळ,रा.लालजैन मंदिराच्या पाठिमागे, पद्मावती नगर,वरणगांव,भुसावळ)असे बुडून मृत्यू झालेल्यांची नावे असून ते बालेवाडी येथे एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत होते.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी पुणे येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनी मध्ये काम करणारे सुमारे ८ मित्र पवना धरण लगत असलेल्या दुधिवरे येथील एका हाँटेल वर फिरण्यासाठी आले होते. यामधील काहीजण पवनाधरणाच्या पाण्यात दुपारी ०४:०० वाजण्याच्या सुमारास बोट घेऊन पाण्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेले. ती उलट्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टिम व मावळ वन्य जीव रक्षक यांच्या वतीने धरणात बुडालेल्या दोन पर्यटकांचा शोध सुरु केल्यानंतर बुधवार ( दि.४ रोजी ) संध्याकाळी आठ च्या सुमारास एकाचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर रात्री अंधार झाल्यामुळे शोधकार्य बंद करण्यात आले व गुरुवार दि.५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शोधकार्य सुरु केले व दुपारी ०२:३० वाजण्याच्या सुमारास दुसरा मृतदेह मिळून आला. यानंतर श्ववच्छदेनेसाठी खंडळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आला असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे, युवराज बनसोडे, सिताराम बोकड, नवनाथ चपटे, नितीन कदम हे करत आहे.
लाईफ जॅकेट घातले नव्हते
मिळालेल्या माहितीनुसार तरुणांनी कोणीही लाईफ जॅकेट घातलेले नव्हते. त्यामुळे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवीला असून या प्रकरणी हाँटेल मालकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
कडक कारवाईची मागणी
पवनाधरण परिसरात असे अनेक पर्यटक पर्यटनासाठी येत असतात. पंरतु बोट मध्ये जीवरक्षक उपकरणे नसतात. दरवर्षी पवनाधरणात अशा अनेक दुर्घटना घडतात ज्यात पर्यटकांना जीव गमवावा लागतो. परंतु यांच्यावर पवनाधरण, मत्स्य विभाग किंवा स्थानिक पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच बेकायदेशीरपणे बोट चालकांनवर बुधवार च्या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने बेकायदेशीर बोट चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.