पुणे - वन नेशन, वन इलेक्शन विषयावर दिल्लीमध्ये सुरू असलेल्या बैठकीदरम्यान जम्मू- काश्मीरच्या पहलगाममधील घटनेबाबत माहिती मिळाली. यानंतर काही वेळात मला पुण्यातील सुद्धा पर्यटक अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील दुर्दैवी घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. या घटनेत पुण्यातील दोन नागरिकांना गोळ्या लागल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक भावनिक आणि जबाबदारीने परिपूर्ण प्रतिक्रिया दिली.
माध्यमांशी बोलतांना त्या पुढे म्हणाल्या,ही घटना अत्यंत गंभीर असून आपण कितीही निषेध केला तरी तो अपुरा ठरेल. जोपर्यंत गृहमंत्रालयाकडून अधिकृत माहिती येत नाही, तोपर्यंत सर्वांनी जबाबदारीने आणि संयमाने वक्तव्य करावीत. असे आवाहनही त्यांनी केलं.सुळे यांनी मुख्यमंत्री उमरअब्दुल्लांशी संपर्क साधून माहिती घेतली आणि केंद्राकडे तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. सध्या अनेक भारतीय नागरिक विविध भागांत अडकले असून, त्यांचं सुरक्षितरित्या घरी पोहोचणं हेच सध्या सर्वात महत्त्वाचं आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व घडामोडींची माहिती घेतल्यानंतर तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वांना योग्य माहिती द्यावी.विमानाच्या आणि रेल्वेच्या तिकिटांचे वाढलेले दर लक्षात घेता, सुळे यांनी विमान व रेल्वे प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ही काही नफा कमावण्याची वेळ नाही, तर प्रत्येक भारतीय नागरिकाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. असे सांगत त्यांनी शासन आणि प्रशासनाला संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले. संपूर्ण घटनेबाबतची माहिती मिळेपर्यंत संयम, सहकार्य आणि जबाबदारीचे भान राखण्याचे आवाहन सुळे यांनी सर्वसामान्य नागरिकांनाही केले आहे.