पुणे : देशातील शंभर साखर कारखाने सुरु झाले असून, त्यात ४.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील ऊस गाळपास २२ नोव्हेंबर पासून सुरुवात झाला आहे. मात्र, अजूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कारखाने सुरु झाले असल्याने गेल्यावर्षीपेक्षा देशाचे साखर उत्पादन निम्मे देखील झालेले नाही. गेल्यावर्षी याच काळात देशभरातील ३१० साखर कारखाने सुरु झाले होते. लांबलेला पाऊस आणि उसाचे नुकसान झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कारखाने सुरु होण्यास विलंब लागला. महाराष्ट्रात २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात १५ नोव्हेंबर अखेरीस १४९ साखर कारखाने सुरु झाले होते. तसेच, ६.३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा हंगाम २२ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. सद्य:स्थितीत राज्यातील सहा कारखानेच सुरु झाले आहेत. कर्नाटकातील १८ कारखाने सुरु झाले असून, १.४९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्यावर्षी ५३ कारखान्यात ३.६० लाख टन साखर उत्पादित झाली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यातच यंदा झालेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाल्याने साखरेच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत ४५ ते ५० लाख टनांची घट होण्याचा अंदाज आहे. उत्तरप्रदेशातील ६९ कारखाने सुरु झाले असून, २.९३ लाख टन साखर उत्पादित झाली होती. गेल्यावर्षी याच काळात १.७६ लाख टन साखर उत्पादित झाली होती. उत्तराखंड आणि बिहारमधील प्रत्येकी २, हरयाणा १, गुजरात ३ आणि तमिळनाडूमधील ५ कारखाने सुरु झाले आहेत. या कारखान्यांनी ४९ हजार टन साखर उत्पादित केली आहे. -------------------देशात २ लाख टन साखरेची निर्यात देशातील ५३५ कारखान्यांच्या गोदामामधे १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. त्यामुळे यंदा ६० लाख टन साखर निर्यातीस केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पैकी २ लाख टन साखरेची निर्यात झाली असून, १२ लाख टन साखर निर्याचीचे करार झाले आहेत.
देशात पाच लाख टन साखरेचे उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:00 PM
उत्तरप्रदेश आघाडीवर : देशातील दीडशे कारखाने झाले सुरु
ठळक मुद्देगेल्यावर्षी याच काळात देशभरातील ३१० साखर कारखाने सुरु महाराष्ट्रात २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात १५ नोव्हेंबर अखेरीस १४९ साखर कारखाने सुरु