पुणे : किरकोळ कारणावरून पर्वती दर्शन येथे झालेल्या दंगलीला तत्कालिक कारण पुरेसे ठरले असले, तरीदेखील याला काही दिवसांपासूनची खदखद कारणीभूत ठरली आहे. दंगल उसळल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या परिने सामाजिक सौहार्द टिकविण्याचा प्रयत्न केला; परंतु घटनास्थळाला भेट दिलेल्या लोकप्रतिनिधी आणि राजकीय पुढाऱ्यांनी मात्र धार्मिक सलोखा टिकवण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून भावना भडकवणारी वक्तव्ये केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांना मात्र हातचे काम सोडून, या राजकीय कार्यकर्त्यांचीच समज काढण्याची वेळ आली आहे.मशिदीमध्ये नमाजला जात असताना मंडळासमोर दुचाकी लावताना डोळ्यांवर हेडलाइटचा प्रकाश पडला म्हणून वादावादीला सुरुवात झाली. या किरकोळ कारणाचे पर्यवसान दंगलीमध्ये झाले. यामध्ये दोन्ही बाजूंचे १२ जण जखमी झाले. पोलिसांनी उपलब्ध मनुष्यबळामध्ये प्रयत्नपूर्वक ही दंगल नियंत्रणात आणली. तीनच दिवसांपूर्वी या भागात पोलिसांच्या सहकार्याने काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. शहरातही विविध भागांमध्ये रोजा इफ्तार सुरू आहेतच. गणेशोत्सव, नवरात्र, ईद, रमजान, नाताळ, दिवाळी काहीही असले, तरी सामाजिक सलोखा टिकवण्याची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडते. त्याला राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत नाही. कायदा सुव्यस्थेची घडी बिघडली की, पोलिसांना जबाबदार धरण्यात येते; परंतु ही तेढ निर्माण करणाऱ्यांना कोणीही जाब विचारत नाही.
सलोखा जपण्याऐवजी भडकावल्या भावना
By admin | Published: July 09, 2015 3:11 AM