पुणे : राज्यात मुसळधार पावसअभावी रखडलेल्या भातपेरण्या पूर्ण होऊन त्यांची टक्केवारी आता शंभरपर्यंत आली आहे. खरिपाच्या एकूण ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, नीचांकी पेरणीचे संकट सध्याच्या पावसामुळे टळले आहे. राज्यात खरिपाच्या हंगामात १ कोटी ४३ लाख ५६ हजार २०० हेक्टरवर पिके घेतली जातात. आजवर १ कोटी ३२ लाख ९७ हजार २०० हेक्टरवर म्हणजे ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात तृणधान्ये ७७ टक्के, कडधान्ये ८१ व तेलबिया १२१ टक्के असे प्रमाण आहे. कापसाचे ३३ लाख ५६ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असून, कापसाची लागवड ११४ टक्के क्षेत्रावर झाली आहे. उसाची १६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाअभावी भाताच्या आॅगस्टपर्यंत केवळ ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या होऊ शकल्या होत्या. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर कडधान्ये व तेलबियांच्या पेरण्या वाढल्या. भातासह ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांचा तृणधान्यांत समावेश असून ज्वारी ३९, बाजरी ५६ तर नाचणी ७८ टक्के क्षेत्रावर पेरण्यात आली आहे. मका १२८ टक्के, अन्य तृणधान्ये ७९ टक्के असे पेरण्यांचे ताजे चित्र आहे. खरीप तेलबियांचे ३३ लाख ९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र आहे. तेलबियांपैकी भुईमुगाची पेरणी ६४ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. तीळ ३१ टक्के, कारळ ३५ टक्के, सूर्यफू ल १३ टक्के असे प्रमाण असून, शेतकऱ्यांना अधिक भाव मिळवून देणाऱ्या सोयाबीनची तब्बल १३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. २७ लाख ९९ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असताना ३७ लाख ७३ हजार ९०० वर पेरणी झाली आहे. खरीप तेलबियांचे एकूण पेरणी क्षेत्र त्यामुळे १२१ टक्क्यांपर्यंत गेले आहे. पावसाने दोनदा मारलेल्या दडीमुळे यंदा खरिपाचे उत्पादन कमी येण्याची भीती व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)
परतीच्या पावसाने भात उत्पादकांना दिलासा
By admin | Published: September 23, 2015 3:36 AM