पुणे : राज्यात बुधवारी कोकणातील तुरळक ठिकाणे वगळता पावसाने विश्रांती घेतली. येत्या दोन दिवसांतही राज्यात काही ठिकाणीच पाऊस पडण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. राज्यात काहीसा उकाडा वाढला आहे. बुधवारी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कमाल तापमान ३५.५ डिग्री सेल्सिअस नोंदविले गेले. बहुसंख्य भागातील पावसाचा जोर आता पूर्णपणे कमी झाला आहे. कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस झाला उर्वरित महाराष्ट्रात कडकडीत ऊन पडले होते.वायव्य राजस्थान व लगतच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता विरून गेले आहे तर ईशान्य लगतच्या पश्चिम बंगाल आणि बिहारच्या भागावर असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर बांगलादेश आणि लगतच्या भागावर आहे. कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्याने पावसाचा जोर कमी झाला आहे. (प्रतिनिधी)
राज्यात पावसाने घेतली विश्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2015 2:01 AM