पुणे : तौक्ते वादळाचा फटका पुण्यातल्या रस्त्यांना बसला आहे. मुंबई व कोकण किनारपट्टीवर असलेल्या डांबर कारखान्यांचे नुकसान झाल्याने पुण्यासाठी होणारा डांबर पुरवठा ठप्प झाला आहे. मागील दहा दिवसांपासून डांबरच न आल्याने पावसाळ्याच्या तोंडावर शहरात खोदून ठेवलेले रस्ते पूर्ववत होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पालिकेच्या पथ विभागामार्फत दरवर्षी रस्त्यांच्या डागडुजीचे काम केले जाते. यासोबतच खड्डे बुजविणे, रस्त्यांचे डांबरीकरण आदी कामे केली जातात. या पावसाळापूर्व कामांनादेखील फटका बसला आहे. तौक्ते वादळाचा फटका बसल्याने पुण्यातील कारखान्यांना कच्चा माल मिळालेला नाही. त्यामुळे येरवडा येथील हॉट मिक्स प्लांटमधील काम ठप्प आहे. त्याचा परिणाम रस्त्यांच्या कामावर झाला आहे.
येरवड्यात असलेल्या हॉट मिक्स प्लांटमध्ये दिवसाला साडेतीन हजार टन डांबर हॉटमिक्स केले जाते. या साडेतीन हजार टन डांबरामध्ये चार हजार चौरस मीटरचे काम केले जाऊ शकते. येत्या दोन-तीन दिवसांत डांबर पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता असून त्यानंतर रस्त्यांची कामे सुरू होतील सर्व अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
------
तौक्ते वादळाचा फटका पुण्यातल्या रस्त्यांना बसला असून कोकण व मुंबईतील डांबर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे वादळात नुकसान झाले आहे. पालिकेचा डांबर पुरवठा बंद असल्याने येरवडा येथील हॉटमिक्स प्लांटचे काम बंद आहे. दोन दिवसांत डांबर उपलब्ध होणार असल्याने शहरातील पथ विभागाचे काम सुरू होईल.