पुणे : जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्मार्ट रेशनकार्ड व बायोमेट्रिक धान्यवाटप योजनेसाठी सर्व रेशनकार्डधारकांनी अर्जासोबत बँक खाते क्रमांक, घरातील ज्येष्ठ महिलेचा फोटो आणि मोबाईल क्रमांक यांची माहिती आपल्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे ३० जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन केले होते. परंतु, याबाबत नागरिकांमध्ये असलेली उदासीनता, दुकानदारांकडून मिळणारे असहकार्य, आधार कार्ड नसणे या कारणांमुळे मोहिमेला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दोन महिन्यांत केवळ ४ टक्के नागरिकांनी हा अर्ज भरून दिला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या बायोमेट्रिक मोहिमेत ४० टक्के धान्याची बचत होत असल्याचे निदर्शनास आले होते. न्यायालयाने सर्व शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचे आदेश दिले होते. सध्या राज्यात रेशनकार्ड आधार लिकिंग करण्याची मोहीम सुरू आहे. मात्र, स्वस्त धान्य दुकानदारांकडून मिळणारी अपमानस्पद वागणूक व रेशनकार्ड धारकांचे अर्ज आणि कागदपत्रे हरवण्याचे प्रकार होत आहेत. अनेक कटुंबांतील महिलांकडे आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक नाही, नवविवाहित महिलेचे सारसरचे व माहेरचे नाव वेगळे आहे. यामुळे रेशनकार्ड आधार लिकिंगचा अर्ज भरून देण्यास अडचण येत आहे.(प्रतिनिधी)
‘स्मार्ट रेशनकार्ड’ मोहिमेकडे पाठ
By admin | Published: July 09, 2015 3:08 AM