आता ती परिस्थिती राहिली नाही; शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पिककर्जाचे पैसे भरा, अजित पवार स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 20:49 IST2025-03-28T20:48:57+5:302025-03-28T20:49:22+5:30
यंदा '७ लाख २० कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना, जवळपास ६५ हजार कोटी रुपये, वीज माफी, लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करावी लागली

आता ती परिस्थिती राहिली नाही; शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पिककर्जाचे पैसे भरा, अजित पवार स्पष्टच बोलले
बारामती: शेतकऱ्यांनी ३१ मार्च पुर्वी पिककर्जाचे पैसे भरा. परिस्थितीनुसार निर्णय घेवू, आता ती परिस्थिती नाही. त्यामुळे यावर्षी आणि पुढील वर्षी देखील घेतलेल्या कर्जाचे पैसे भरा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवर महत्वपुर्ण भाष्य केले.
माळेगांव सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थ कार्यालय येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, आज २८ मार्च आहे. आज स्पष्ट सांगतो की, पीक कर्जाचे पैसे ३१ तारखेच्या आत भरा. मी राज्याचे ११ अर्थसंकल्प सादर केले आहेत. यंदा '७ लाख २० कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना, जवळपास ६५ हजार कोटी रुपये, वीज माफी, लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद करावी लागली आहे. तसेच साडेतीन लाख कोटी रुपये अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सर्व स्टाफचे पगार, पेन्शन तसेच घेतलेल्या कर्जाचे व्याज ४ लाख १५ हजार कोटी यासाठीच जातात. राहिलेल्या पैशातून शाळा, गणवेश, पुस्तके, हॉस्टेल, रस्ते, लाईट, पाणी, मूलभूत गरजा व इतर खर्चासह इतर अनेक प्रकारच्या खर्चाला द्यावे लागतात. त्यामुळे पिककर्जाबबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेवू,सध्या ती परिस्थिती नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पिककर्जाच्या शुन्य टक्के व्याजासाठी १००० ते १२०० कोटी रुपये ‘पासआउट’ केले आहे. दुध अनुदानाचे पैसे बहुतेकांच्या खात्यावर जमा झाले आहेत. जाहिर केलेले दिले आहे. शेतकऱ्यांनी तिळमात्र शंका घेवुू नये, असे पवार म्हणाले. केव्हीके ने पुढाकार घेतलेले कृषि क्षेत्रातील ‘अेआय’ तंत्रज्ञान सर्व क्षेत्रात येणार आहे. आपल्या भागात देखील या तंत्रज्ञानाशिवाय ऊसाचे ‘टनेज’वाढणार नाही, तसेच पाण्याची बचतही होणार नाही. या तंत्रज्ञानासाठी ५०० कोटींची तरतुद केल्याचे पवार यांनी सांगितले.