पिंपरी : लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही जिंकलो. विधानसभेमध्ये आम्ही हरलो, त्याची कारणे काय आहेत सर्वांना माहीत आहेत. पण, तरीही या पराभवाने खचून न जाता आगामी निवडणुकांना आम्ही सामोरे जात आहोत. या निवडणुकांसाठी आम्ही स्वबळाचा नारा दिला असला, तरी तो केवळ मुंबईपुरता आहे, अशी भूमिका शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी स्पष्ट केली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये शहरात आले असता ते बोलत होते. ते म्हणाले की, स्वबळाचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी संपुष्टात आली, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. मुंबईवगळता पुणे असेल पिंपरी-चिंचवड असेल किंवा इतर शहरात एकत्र लढण्याचा सर्वांचाच विचार आहे.
एकनाथ शिंदे यांचे ‘हायकमांड’ भाजप
आमदारांचा मान राखून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्याचे सांगितले जाते, यावर राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे हायकमांड भाजप आहे आणि हायकमांडने त्यांना आदेश दिला, तर तो त्यांना मानावा लागतो. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या हायकमांडचा आदेश मानला. त्याच हायकमांडचा आदेश शिंदे यांनी पाळला. त्यांना पर्यायही नव्हता. उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले नसते, तर त्यांनी काय केले असते? आपली कातडी वाचवण्यासाठी, पुढचे खटले थांबवण्यासाठी, पुढे त्रास होऊ नये, यासाठी त्यांना सरकारमध्ये जाणे भाग होते. ज्या पद्धतीने मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी तोडली गेली, त्याच पद्धतीने अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही पक्ष तोडला जाईल. भाजपला पक्ष तोडण्याची चटक लागली आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचाही पक्ष ते तोडतील.
मोदी, शाह यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्यांसोबत आम्ही नाही
दोन्ही ठाकरे एकत्र येतील का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, हा प्रश्न गेली २५ वर्षे विचारला जात आहे, पण त्याला उत्तर नाही. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. शिवसेनेची विशिष्ट भूमिका आहे. जे पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी हातमिळवणी करतील, त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही.