यंदा माऊलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे २ जुलैला आळंदीतून तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १ जुलैला देहूतून पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. मात्र सद्यस्थितीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन सुरू असून 'संचारबंदी' कायम आहे. तर सर्व धार्मिक स्थळेही भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहेत.
गत वर्षी शासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वच संतांचा आषाढी पायीवारी पालखी सोहळा रद्द केला होता. वारीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून शासनाच्या जबाबदारीवर प्रमुख निवडक संतांच्या चलपादुका मर्यादित वीस वारकाऱ्यांसमवेत बसने पंढरीला विठूचरणी नेण्यात आल्या होत्या. वास्तविक कोरोना हद्दपार करण्यासाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाचे वारकरी संप्रदायातील प्रत्येक घटकाने काटेकोर पालन करून आषाढीवारी घरीच राहून साजरी केली होती.
यंदा 'तुकोबा-माऊलीं'च्या सहवासातून पंढरीला जाण्याची वारकाऱ्यांची मनोमन इच्छा आहे. मात्र यंदाही कोरोनाची दुसरी लाट सुरू असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे महिन्यावर आलेली वारी आरोग्याचा विचार करता नियमावलीतच व्हावी, असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे.