दासगाव : कोकणात पिकवल्या जाणाऱ्या भात पिकाला उत्तम हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी या पिकापासून दूर जात आहेत. त्यामुळे सरकारने या भाताला १४ रुपये ५० पैसे हमीभाव दिला आहे. यापेक्षा कमी दराने भात विक्री झाली असल्यास शेतकऱ्यांनी रायगड जिल्हा शेतकरी संघटनेकडून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.कोकणात एक वेळचे भातपीक घेतले जाते. हे पीक घेत असताना शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीतच गुंतला असल्याने आणि कोकणातील भौगोलिक स्थिती पाहता भातपीक न परवडणारे ठरू लागले आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी अवस्था आहे. मात्र आता यामध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागली असून, पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक यंत्राचा वापर कोकणातील शेतकरी करू लागले आहेत, असे असले तरी कोकणातील शेतकऱ्यांच्या भातपिकाला चांगला भाव मिळावा याकरिता राजकीय पुढारी शासनदरबारी भांडत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे भातपीक केवळ घरापुरतेच सीमित राहिले आहे. रायगड जिल्हा शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्यानंतर शासनाने भात खरेदी केंद्र सुरू करण्याबरोबरच साधारण दर्जाच्या भाताला १४ रुपये १० पैसे तर अ दर्जाच्या भाताला १४ रुपये ५० पैसे हमीभाव देण्याचे आदेश दिले आहेत. यापैकी कमी दराने भात खरेदी होत असेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीने आळा घालणे गरजेचे असल्याचेही सांगितले आहे.
भाताला साडेचौदा रु पयांचा हमीभाव
By admin | Published: January 05, 2016 2:05 AM