Cyclone Nisarga: चक्रीवादळाने खूप काही शिकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:08 AM2020-06-14T00:08:03+5:302020-06-14T00:08:45+5:30

कोस्टल विभागांमध्ये भविष्यात मनुष्यहानी आणि घरांचे नुकसान रोखायचे असेल तर, आपत्तीला सुसंगत अशी घरांची उभारणी करावी लागेल. मात्र, त्याचवेळी कोकणच्या संस्कृतीला कोणताच धक्का लागता कामा नये

Cyclone Nisarga taught a lot of things | Cyclone Nisarga: चक्रीवादळाने खूप काही शिकवले

Cyclone Nisarga: चक्रीवादळाने खूप काही शिकवले

googlenewsNext

रायगड जिल्ह्याला ‘निसर्ग’ चक्रीवादळाने तब्बल सव्वाशे वर्षांनी तडाखा दिला. या वादळाची भीषणता इतकी वेदनादायक होती की, तिचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. प्रशासनाने वादळापूर्वी आणि वादळानंतर कोणती आव्हाने स्वीकारली, याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. कोस्टल विभागांमध्ये भविष्यात मनुष्यहानी आणि घरांचे नुकसान रोखायचे असेल तर, आपत्तीला सुसंगत अशी घरांची उभारणी करावी लागेल. मात्र, त्याचवेळी कोकणच्या संस्कृतीला कोणताच धक्का लागता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कोकणच्या पश्चिम किनारपट्टीपासून ते गुजरात-दमणदरम्यान ३ जूनला चक्रीवादळ येणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून १ जूनला मिळाली. समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तब्बल ४,६०० नागरिकांना तातडीने माघारी बोलाविण्यात आले. कोस्टल ग्रामपंचायतींमधील सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असतानाच २ जूनला सकाळीच असे कळले की, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथे ‘निसर्ग’ नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. त्यानंतर, काही तासांमध्येच ते जिल्ह्याची राजधानी असलेल्या अलिबागमध्ये धडकणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर, श्रीवर्धन-हरिहरेश्वरला धडकणार असल्याची पक्की माहिती मिळाली. तत्पूर्वी प्रशासन तयारीला लागले होते.
कमी कालावधीत कोस्टल विभागातील सर्वांचेच स्थलांतर करणे शक्य नव्हते. यासाठी आम्ही कच्ची घरे असणाऱ्यांचेच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. प्रशासनाच्या आवाहनानंतर तब्बल ५० हजारांहून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आम्हाला यश आले. सर्व प्रशासकीय यंत्रणांना तयारीत राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नागरी संरक्षण दल, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, जेसीबी, वूड कटिंग मशीन अशा सर्वच तयारीने प्रशासन सज्ज होते.
आपत्तीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाचा संपर्क तुटणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. वायरलेस, सॅटेलाइट फोन, हॅम रेडिओ या यंत्रणांना सज्ज केले. आता फक्त वादळ कोठे आणि कधी धडकणार, याकडेच आमचे लक्ष लागले होते. श्रीवर्धन येथे ३ जूनला दुपारी सव्वाबारा वाजता वादळ धडकले. त्यानंतर, पुढील किमान सहा तास कोणीच बाहेर न पडण्याच्या आम्हाला सूचना होत्या. तशा आम्ही त्या सर्वत्र पुढे दिल्या.
ओडिशामध्ये अशा पद्धतीच्या आपत्ती येत असतात. त्यामुळे तेथील प्रशासनाशी संपर्क साधून वादळात काय करायला पाहिजे आणि काय करू नये, याचे मार्गदर्शन घेतले. त्याचा आम्हाला ग्राउंडवर काम करताना खूपच फायदा झाला. आयएएसमध्ये आम्हाला याबाबतचेही प्रशिक्षण दिले जाते. त्यावेळी खूपच बोअरिंग वाटायचे. मात्र, वादळात त्या ज्ञानाचा उपयोग करता आला. मी त्यावेळी हॅम रेडिओची सदस्य होते. हॅम रेडिओ कसा वापरायचा, आपत्तीत त्याचे नेटवर्क सुरू राहते, याची माहिती होती. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व हॅम रेडिओचे सदस्यही खूश झाले.
माझे सरकारी घर अगदी समुद्रकिनारी आहे, त्यामुळे मला बºयाच जणांनी सल्ला दिला की, तुम्ही लहान मुलांना घेऊन तेथे राहू नका. मला अ‍ॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण दिले होते की, आपत्तीत कोणती घरे टिकतात आणि कोणती नाही. त्यामुळे मी बिनधास्त होते. हा विश्वास पुस्तकांमुळे मिळाला. अनुभवातून प्राप्त झाला.
रायगड जिल्ह्याच्या कोस्टल विभागात दोन मृत्यू झाले. आपत्तीमध्ये बाहेर पडायचे नसते, याची माहिती नसल्याने असे प्रकार घडतात. जपानमध्ये सातत्याने भूकंप येतात. ओडिशामध्येही आपत्ती येतच असते. मात्र, तेथील नागरिकांना आपत्तीबाबत माहिती आहे, ते जागरूक आहेत. त्यामुळे तेथे मृत्युदर कमी आहे. चक्रीवादळ, पूर, भूकंप अशा घटना घडतच राहणार आहेत. त्यामुळे आपत्तीबाबतचे प्रशिक्षण प्रत्येकाने घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्यांच्या नारळ, सुपारी, आंबा, काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, त्यांना जास्तीतजास्त नुकसानभरपाई देऊन आर्थिक विषमता ढासळू न देण्यासाठी सरकार आणि प्रशासन खंबीरपणे आपद्ग्रस्तांच्या पाठीशी उभे राहील. रत्नागिरी कृषी विद्यापीठाला नारळ, सुपारी, आंबा यांची प्रत्येकी एक लाख रोपे रायगडसाठी आरक्षित करून ठेवण्याबाबतही सांगितले आहे.
कोविडमध्ये फार्मा सेक्टर, मास्क तयार करणाºया कंपन्यांची श्रीमंती वाढली आहे. रस्त्यावर फळे-भाजी विकणारे, सलूनचा व्यवसाय करणारे यांना मात्र आर्थिक फटका बसला आहे. निरनिराळ्या आपत्तींमध्ये समाजामध्ये अशा प्रकारची आर्थिक विषमता निर्माण होते. यासाठी सर्वांनी नव्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- शब्दांकन : आविष्कार देसाई

अलर्टमध्ये कोस्टल विभागातच ‘निसर्ग’ चक्रीवादळ येणार असल्याचे सांगितले होते. मात्र, पेण, सुधागड, माणगाव, रोहा, पनवेल अशा ठिकाणीही ते धडकले. तब्बल सहा तास जिल्ह्यातच हे वादळ घोंगावत होते.
फक्त कोस्टलच नाही, तर अन्य भागांतही त्याचा फटका बसणार आहे, हे भारतीय हवामान विभाग अथवा तज्ज्ञांनी सांगितले असते, तर या तालुक्यांवरही आम्हाला लक्ष देता आले असते आणि तेथील हानी टाळू शकलो असतो.
कोस्टल विभागात न येणाºया पेण, म्हसळा येथे प्रत्येकी एक आणि माणगाव येथे दोघांचा मृत्यू झाला. परंतु, आपत्तीबाबत कोणीच ठोसपणे सांगू शकत नाही. त्यामुळे कोणालाच दोष देता येणार नाही. आपत्ती निवारण केंद्र जिल्ह्यात लवकरात लवकर बनले पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे.

Web Title: Cyclone Nisarga taught a lot of things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.