"...तर मग ते कसलं प्रशासन?", इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 03:26 PM2023-07-20T15:26:09+5:302023-07-20T15:26:46+5:30

Raigad Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. 

Irshalwadi Landslide Speaking on the incident of landslide in Irshalwadi area near Khalapur in Raigad district, MNS president Raj Thackeray criticized the administration  | "...तर मग ते कसलं प्रशासन?", इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

"...तर मग ते कसलं प्रशासन?", इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

googlenewsNext

raigad news today : रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला. गुरूवारची सकाळ झाली अन् महाराष्ट्राच्या कानावर सुन्न करणारी बातमी पडली. या दुर्घटनेत अनेक घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली. रात्री ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली त्यानंतर स्थानिक प्रशासन, एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली. अतिवृष्टीमुळे ही दुर्घटना घडल्याचे बोललं जात आहे. त्यात या घटनेनंतर विविध प्रतिक्रिया पुढे येत आहे.  अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत प्रशानसनाला धारेवर धरलं.

राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला. तसेच जखमींवर उपचार सुरू आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत करता येईल हे पाहण्याचं आवाहन त्यांनी महाराष्ट्र सैनिकांना केलं आहे. "रायगड जिल्ह्यातील, खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा. जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं. खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती, पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन? असो. पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा", असं राज यांनी ट्विटमध्ये म्हटले.

इर्शाळवाडीत काय घडलं?
रायगडच्या चौक-मानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इर्शाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना १९ जुलै २०२३ रोजी रात्री घडली. या दुर्घटनेत गावातली घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळं ही दुर्घटना घडली. दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबी सारख्या मशनरी घटनास्थळी पोहोचविण्यासाठी अडथळे येत आहेत.

इर्शाळवाडीमध्ये एकूण ४८ कुटुंब आहेत, तेथील लोकसंख्या २२८ असली तरी अनेक लोक नोकरीच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेर गावी असतात त्यामुळे दुर्घटनेच्यावेळी नक्की किती लोक गावात होते हे समजू शकत नाही. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Irshalwadi Landslide Speaking on the incident of landslide in Irshalwadi area near Khalapur in Raigad district, MNS president Raj Thackeray criticized the administration 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.