तलवार घेऊन निघणाऱ्या मराठ्यांनी शांततेत 52 मोर्चे काढले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 00:29 IST2018-10-27T22:37:30+5:302018-10-28T00:29:53+5:30
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला हार्दीक पटेल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र

तलवार घेऊन निघणाऱ्या मराठ्यांनी शांततेत 52 मोर्चे काढले, पण...
रायगड - महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा बांधण्यात येत आहे. जवळपास 23 हजार कोटींचा हा पुतळा आहे. मात्र, शिवाजी महाराजांनी कधीही माझा पुतळा बांधा, असे म्हटले नाही. केवळ माझी प्रजा आनंदी राहिली पाहिजे, असा महाराजांचा आग्रह होता. पण, हे सरकार पुतळ्यांच राजकारण करून सर्वांना मूर्ख बनवित आहे. तलवार घेऊन निघणाऱ्या मराठ्यांनी 52 मोर्चे काढले, पण शेवटी काय मिळालं ? असा प्रश्नही हार्दिक यांनी उपस्थित केला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडच्या नवव्या राज्यस्तरीय अधिवेशनाला हार्दीक पटेल यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. यावेळी, हार्दीक पटेल यांनी राज्य सरकार आणि भाजपला टार्गेट करताना महाराष्ट्रातील पुतळ्याचा मुद्दा उचलून धरला आहे. गुजरातमध्येही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे भूमीपूजन 2007 मध्ये झाले होते. मात्र, पुतळा उभारण्यासाठी तब्बल 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत वाट पाहावी लागली, यासाठी म्हणजेच 10 वर्षांचा कालावधी लागला. पुतळ्यावरुन लोकांना मूर्ख बनविण्याचं काम तेथील सरकारने केलं आहे. आता, महाराष्ट्रातही तेच सुरू आहे. शिवाजी महाराजांनी कधीही माझा पुतळा बांधा, असे म्हटले नाही. केवळ माझी प्रजा आनंदी राहिली पाहिजे, असा महाराजांचा आग्रह होता. मात्र, आज राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्या केली. नाशिकपासून मुंबईपर्यंत 180 किमीपर्यंत शेतकरी चालत आले. पण, सरकार सोईस्करपणे हे सर्व विसरून जाते. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे देशासमोरील सर्वात मोठे प्रश्न असल्याचे हार्दीक पटेल यांनी म्हटले. तलवार घेऊन निघणाऱ्या शूर वीर मराठ्यांनी 52 मोर्चे काढले, पण मिळालं काय ? असा प्रश्न हार्दिक यांनी विचारला आहे. सरकारकडून केवळ पुतळ्यांचं राजकारण करुन जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोपही हार्दिक यांनी केला.